महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत वर्धा येथे पी एम विश्वकर्मा योजनेचा सोहळा पार पडत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत. पीएम विश्वकर्मा कार्यक्रम वर्धा येथील सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.
वर्ध्याच्या पावन भूमीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आज महत्वाच्या योजनांचा शुभारंभ तसेच पायाभरणी होत आहे. यामध्ये विश्वकर्मा योजनेचा प्रथम वर्धापन दिन, अमरावती पीएम मित्रा पार्कचा पायाभरणी कार्यक्रम, अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आणि आचार्य चाणक्य कौशल्य विकास योजनेचा शुभारंभ यासारख्या योजना प्रकल्पांचा समावेश आहे. आज अमरावती येथे उभारण्यात येणार असलेल्या पीएम मित्रा पार्कच्या माध्यमातून विदर्भासह राज्यातल्या औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. विदर्भातल्या पांढऱ्या सोन्याला खऱ्या अर्थाने सोन्याचे दिवस येणार आहेत. या टेक्सटाईल पार्क मध्ये १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीची शक्यता आहे. एक लाखापेक्षा जास्त रोजगाराची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी भूमिपूजन केलेले अनेक प्रकल्पांचं त्यांच्याच हस्ते लोकार्पण झालंय. अत्यंत कमी कालावधीमध्ये गतिमान पद्धतीने पायाभूत प्रकल्प पूर्ण करण्याचा विक्रम आपल्या पंतप्रधान महोदयांनी केलेला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशातील अनेक उद्योग महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. नुकताच गडचिरोलीला इस्पात प्रकल्प, म्हापे येथे सेमी कंडक्ट प्रकल्पाचा शुभारंभ झाला यातून अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. मी अधिक न बोलता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या स्वप्नातील कुशल, रोजगारक्षम, विकसित भारत घडवण्याच्या कार्यात आपलं महायुतीचे सरकार आणि राज्यातील जनता आपलं संपूर्ण योगदान देईल, या प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. प्रधानमंत्री महोदयांना धन्यवाद देतो आणि याठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे ही वाचा:
Follow Us