पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज (शुक्रवार, २० सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर असून वर्धा (Vardha) येथे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या (PM Vishvakarma Yojana) वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधत काँग्रेसवर (Congress) जोरदार हल्लाबोल चढवला.
पंतप्रधान मोदी यांनी गणेशोत्सवात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI D.Y. Chandrachud) यांच्या निवासस्थानी भेट देत गणपतीची आरती करत दर्शन घेतले होते. त्यामुळे देशात मोठा गदारोळ उडाला होता. विरोधकांनी या मुद्द्यावरून पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. यावरून पंतप्रधान मोदी यांनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मी गणपतीची पूजा केली हे काँग्रेसला अजिबात आवडलेलं नाही, त्यांनी माझ्या पूजेलाही विरोध केला, असा घणाघात त्यांनी यावेळी केला.
काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. वर्ध्यात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांनी गणपती पूजेच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे चांगलेच वाभाडे काढले. ते म्हणाले, “काँग्रेसला गणपती पूजेची चीड आहे. मी गणेश पूजेला गेले होतो. तेव्हा काँग्रेसने लगेच तुष्टीकरण सुरु केलं. काँग्रेसने माझ्या गणपती पूजेलाही विरोध केला आहे. लांगुलचालन करण्यासाठी काँग्रेस काहीही करत आहे. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात गणेशोत्सव सुरु झाला. सर्व धर्मीय एकत्र येत होते. पण काँग्रेसला गणपती पूजेची चीडच आहे. त्यांनी कर्नाटकात बाप्पाला तुरुंगात टाकलं. पोलीस व्हॅनमध्ये डांबलं. इकडे महाराष्ट्रात गणपतीची पूजा होत होती, तर तिकडे कर्नाटकात गणपती बाप्पा पोलिसांच्या व्हॅनमध्ये होते,” असे ते म्हणाले.
काँग्रेसवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, “काँग्रेसपासून सावध राहा. काँग्रेसने केवळ भ्रष्टाचार वाढवला आहे. भ्रष्ट पार्टी काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट पार्टीचे कुटुंब म्हणजे काँग्रेसचं शाही कुटुंब आहे. त्यामुळे काँग्रेसपासून सावध रहा. त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची संधी देऊ नका. नाहीतर ते तुम्हाला बारबादीकडे घेऊन जातील,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
Follow Us