महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्हिजन वरळी नावाचं एक वरळी विधानसभेच्या विकासाबद्दलच्या कल्पनांचं प्रदर्शन जांबोरी मैदान, वरळी येथे भरवले आहे. या कार्यक्रमाच्या उदघाट्न सोहळा २१ सप्टेंबर रोजी राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. वरळीतील बीडीडी चाळीत मी लहानपणासून कधी वडिलांबरोबर तर कधी बाळासाहेबांसोबत यायचो. आमचे एक डॉक्टर इथेच बीडीडी चाळीत रहायचे. त्यामुळे माझ्या या भागाबद्दलच्या आठवणी खूप जुन्या आहेत, असे म्हणत यावेळी राज ठाकरे यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
गेली अनेक वर्ष इथल्या बीडीडी चाळीचा प्रश्न प्रलंबित आहे, पोलीस वसाहतींचा प्रश्न प्रलंबित आहे, कोळीवाड्यातील समस्या जैसे थे आहेत. हे सगळं बघून त्रास होतो. तुम्ही महाराष्ट्राचे मालक ना? तरीही तुम्हाला त्रास कसा दिला जाऊ शकतो? बाहेरच्या राज्यातील लोंकाना इथे घर मिळतात, ते इथे येऊन झोपड्या वसवून फुकटात घरं घेऊन जातात. याचं कारण तुम्ही योग्य वेळी योग्य ताकद दाखवत नाही आणि समोरच्यांना माहीत आहे की हे जाऊन जाऊन जाणार कुठे? मुळात तुम्हाला या व्यवस्थेच्या लेखी किंमत नाही, असे यावेळी राज ठाकरे म्हणाले.
एखादा प्रकल्प येताना तुम्हाला का विचारलं जात नाही? आणि हे फक्त वरळीत नाही तर महाराष्ट्रभर घडतंय आणि जिथे जिथे हे घडतंय तिथे बघा जास्त टक्का मराठी आहे. ‘असुनी मालक घरचा चोर म्हणती त्याला’ अशी परिस्थिती झाली आहे आपली, आणि हे का होतं? कारण तुम्ही त्याच-त्याच लोकांना मतदान करून आमदार, खासदार निवडून देताय, मग काय तुम्हाला ते गृहीतच धरणार. तुम्हाला स्वाभिमानाने उभं रहायचं असेल, तो स्वाभिमानी मणका दुरुस्त करून घ्या, असे राज ठाकरे यांनी सांगितले. आपल्याकडे कुठलंही शहर असू दे मग ते मुंबई का पुणे शहरं असू देत ती वेडीवाकडी पसरली आहेत, या शहरांमध्ये डेव्हलपमेंट प्लॅन असतो पण टाऊन प्लॅनिंग नसतं. मग कुठल्याही पायाभूत सुविधांचा विचार न करता फक्त आणि फक्त बांधकामं सुरु राहतात आणि तुम्ही सगळे स्क्वेअर फुटांच्या खेळात अडकून पडता. तुमची जागा घेणाऱ्या बिल्डरांना तुम्ही प्रश्नच विचारत नाहीत, मुळात बिल्डरांना तुमच्याशी घेणंदेणं नाही आणि त्यात तुम्ही ज्या राजकारण्यांना निवडून देता, त्यांना पण तुमच्याबद्दल काही वाटत नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे कार्यकर्ते सज्ज; ‘देवा भाऊ देवा भाऊ’…या गाण्याने प्रचाराचा प्रारंभ