माझं व्हिजन, तुमचं व्हिजन, आपलं व्हिजन, व्हिजन वरळी (Vision Worli) या कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते शनिवार २१ सप्टेंबर २०२४, जांबोरी मैदान, वरळी येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या उदघाट्न सोहळ्यात राज ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
काय म्हणाले राज ठाकरे ?
मला अनेकदा वृत्तवाहिन्या पुढच्या १० वर्षात महाराष्ट्र कसा दिसतो, व्हिजन महाराष्ट्र अशा प्रकारच्या कार्यक्रमात बोलवतात. राज्याची व्हिजन १० वर्षांची नाही तर राज्य, देश कसा घडवणार याचं १०० ते २०० वर्षांचं नियोजन पाहिजे, तसा विचार पाहिजे. १० वर्षात काही होत नसतं. १० वर्षात अधिक वाट लागते. ३०,४० वर्षांपूर्वीची मुंबई ज्यांनी पाहिली असेल, तर त्यांना आठवत असेल या शहराला एक कॅरेक्टर होतं. आपली बेस्टची लाल रंगाची बस होती, काळीपिवळी टॅक्सी होती. ती बघितली की हे शहर म्हणजे ‘मुंबई’ हे कळायचं. आज देशात कुठल्याच शहराला ओळख राहिली नाहीये. सध्या शहरांची ओळख ही फक्त फ्लायओव्हर्स झाली आहे. आणि हे फ्लायओव्हर्स होत आहेत ते बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांसाठी. आणि सगळ्या लोंढयांना सुविधा देण्यात इतके पैसे खर्च होतात की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांसाठी काही करायचं तर पैसे नाहीत अशी परिस्थिती आहे. इथल्या मूळच्या माणसांना सगळ्या आवश्यक त्या गोष्टी मिळाल्या, तो सुखी झाला आणि मग बाहेरचा कोणी आला तर आम्ही समजून घेऊ. पण आहे त्यांनाच काही मिळत नाहीये, आणि बाहेरच्यांना देण्यासाठी या राज्याचा सगळा पैसा खर्च होणार असेल तर हे कसं चालणार? निवडणुका, राजकारण यांत सगळे मूळ विषय बाजूला पडतात. सत्ताधारी असोत की विरोधी पक्ष असू देत, सगळे एकसारखेच वागत असल्याचा घणाघात यावेळी राज ठाकरे यांनी केला.
स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा पाहिला आहे का? त्यांना शिल्पकला कळते का?
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विषय काँग्रेसच्या सरकारपासून सुरु होता. तेव्हापासून मी सांगत होतो की समुद्रात पुतळे उभारण्यापेक्षा, महाराजांचे गडकिल्ले हे त्यांचे खरं स्मारक आहे, त्याची नीट देखभाल करा, पण नाही. आत्ता मध्ये महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत एक दुःखद घटना घडली. अहो तो पुतळा जमिनीवर होता, जो सुद्धा आपल्याला नीट उभारता नाही आला, इथे तर समुद्रात उभारायचा म्हणत आहेत. आपल्याकडे कोणाच्या डोक्यात काय कल्पना येतात ते सांगता येत नाहीत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्यापेक्षा २ इंच मोठा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात उभारणार अशी घोषणा केली गेली. मुळात ज्यांनी कोणी घोषणा केली त्यांनी तरी स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा पुतळा पाहिला आहे का? त्यांना शिल्पकला कळते का? महाराजांचा असा अश्वारूढ पुतळा उभारायचा ठरवला तर तो अश्व किती मोठा असावा लागेल? कोण शिल्पकार तो उभारणार आहे? आणि समुद्रात जर असा पुतळा उभा करायचा असेल तर किमान २० ते २५ हजार कोटी रुपये लागतील. मला सांगा या २० ते २५ हजार कोटींत आपले गडकिल्ले किती छान होतील. आपल्याला येणाऱ्या पिढ्यांना महाराजांनी उभारलेले गडकिल्ले दाखवायचेत का महाराजांचा पुतळा? असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
हे ही वाचा:
PM Modi महाराष्ट्राला देणार भेट, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्ट अप योजनेचा करणार आरंभ