आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोर लावताना दिसत आहे. अश्यातच आज (रविवार, २२ सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची (NCP Sharad Pawar) शिव स्वराज्य यात्रा जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे पोहोचली आहे. यावेळी खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी शिव स्वराज्य यात्रा निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच राज्यातील महायुती सरकारवर (Mahayuti Government) निशाणा साधत “महाराष्ट्रातून १७ उद्योग गुजरातला गेले, चार लाख कोटी गुंतवणूक करून लाखो तरुणांच्या रोजगार तुमच्या डोळे देखत गेला, महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा असे तरुणांनी सांगायची वेळ आली आहे,” असे म्हणत राज्य सरकारवर चांगलीच आगपाखड केली.
शिव स्वराज्य यात्रा आज चोपडा येथे आली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती, माजी मंत्री सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार कैलास पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव जिल्ह्यातून शिव स्वराज्या यात्रेला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मविआमध्ये कुठेही रस्सीखेच नाही अशी प्रतिक्रिया यावेळी खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
खासदार अमोल कोल्हे याचवेळी म्हणाले, “महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयांचे प्रकल्प गुजरातला जात असताना, महाराष्ट्रातील तरुणांच्या हक्काचा रोजगार इतर राज्यात पळवला जात असताना गुजराती बॉसच्या ताटाखालचे मांजर असलेले महाराष्ट्रातील सत्ताधारी मूग गिळून गप्प बसले आहेत… आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची जबाबदारी आपली आहे !”
“स्वतःला महाशक्ती म्हणवणाऱ्यांच्या डोळ्यादेखत महाराष्ट्रातून उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत, महाराष्ट्रातील युवकांच्या हक्कांचा रोजगार पळवला जात आहे.मात्र, गुजराती बॉसच्या ताटाखालचे मांजर असलेल्या महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना याचे काहीही सोयरसुतक नाही. अशा सत्ताधाऱ्यांना आपण धडा शिकवायचा आहे,” असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.