राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि मंत्री गिरीश महाजन (Girish mahajan) यांच्यातील राजकीय वाद आता संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. त्यात भर म्हणजे गेल्या काही दिवसांत खडसेंच्या भाजप प्रवेशावरुन या वादात आणखीच ठिणगी पडली आहे. खडसेंनी आपल्या भाजप प्रवेशावर गौप्यस्फोट करताना स्थानिक नेते म्हणून गिरीश महाजन व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. या कारणामुळे गिरीश महाजन यांच्याकडूनही पलटवार मिळत आहे. “गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्रजी म्हटले होते, मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला आहे”, असं म्हणत आमदार एकनाथ खडसे (Eknath Shinde) यांनी शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे स्पष्ट सांगितलं.
”एकनाथ खडसे हे हरिभाऊ जावळे यांची बॅग घेऊन जाताना मी त्यांना बघितलं आहे, काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी मी कॉलेजमध्ये होतो. आमदाराची बॅग घेऊन ते फिरत होते, ९० च्या दशकांमध्ये त्यांना पक्षांमध्ये घेतलं, तिकीट दिलं आणि आमदार केलं, ते पंधरा ते वीस वर्ष लाल दिव्याच्या गाडीतच फिरले.”अशी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंची खोचक खिल्ली उडवली. तसेच, ”त्यांच्यासारखा मी काँग्रेसमध्ये नव्हतो. ते नंतर भाजपमध्ये आले. मात्र मी सुरुवातीपासून भाजपमध्येच आहे. मात्र काहीही बोलायचं, बडबड करायची आणि तुमची बोंब का पडत नाही? तुमच्या मतदारसंघात का तुम्ही त्या ठिकाणी पडले?” असा प्रश्नही गिरीश महाजन यांनी उपस्थित केला आहे.
“त्यांनी कितीही अश्लील आणि काहीही बडबड केली तरी माझ्या मतदारसंघांमध्ये माझा जनतेचा विश्वास माझ्यावर आहे. दोन रुग्ण मुंबईला घेऊन जायची तरी बोंब पडली का तुमची एवढ्या वर्षांमध्ये? केवळ पद भोगायची, बडबड करायची, एवढेच कामं त्यांच्याकडे राहिले आहेत. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे ते वाह्यात सारखं काही बोलत आहेत. बोलण्यासारखं तर माझ्याकडे सुद्धा खूप आहे. मी बोलायचं म्हटलं तर त्यांना पळता भुई होईल. वेळ येईल त्यावेळेस मी नक्की बोलेन” असे गिरीश महाजन यांनी खडसेंना सांगितले आहे.