मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसल्यानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी यावरून राज्यातील महायुती सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवरायांची जाहीर माफी मागितली होती. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापले असतानाच आता शिवसेना उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीसाठी वापरले गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. आता भाजप माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली असून ‘वैभव नाईक फक्त राजकारण करतो,’ असे वक्तव्य केले आहे.
वैभव नाईक यांनी आज (रविवार, २२ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर गंभीर आरोप केले. लोकसभा निवडणुकीदरम्यान रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे वाटले गेले. तसेच शिवरायांच्या पुतळ्यातून मिळवलेल्या भ्रष्टाचाराच्या पैश्यांमधून मतदारांना पैसे वाट्ल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केला. तसेच नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी झालेल्या खर्चाबद्दल भारतीय नौसेनेने स्पष्टीकरण देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. यावरून नवा वाद निर्माण झाला असून भाजप माजी खासदार निलेश राणे यांनीदेखील त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले निलेश राणे?
वैभव नाईकांच्या आरोपांवर उत्तर देत निलेश राणे म्हणाले, “वैभव नाईक आजही अडचणीत आहेत. माझ्याकडे १०० % माहिती आल्यानंतरच मी तुमच्याकडे ठेवतो. देव करो वैभव नाईक या घोटाळ्यात नसावा कारण महाराष्ट्रात त्याला लपायला जागा भेटणार नाही. हा एवढा मोठा विषय आहे. आम्ही काळजीपूर्वक स्टेटमेंट करतो कारण त्याचे त्याला नुकसान होऊ नये पण वैभव नाईक फक्त राजकारण करतो. तुला नेमकं काय हवंय? उगाच कुठलेही आरोप कारायचे? जो कार्यक्रम नेव्हीने हाताळला. राज्य सरकारने नेव्हीकडे पैसे दिले होते. कार्यक्रमावेळी तो स्वतः आला होता. तेव्हा भ्रष्टाचार झाला असे वाटले नाही का? पुतळा कोसळण्यामध्ये तुझ्यावर आरोप झाले म्हणून हे बाहेर काढले आहे. ते झाकण्यासाठी तू हे बाहेर काढलंस. जर पुरावा असेल तर भ्रष्टाचार झाला असं वाटत असेल तर तुम्ही पुरावे निवडणूक आयोगाकडे द्या नाहीतर कोर्टात जा… रत्नागिरी-सिंधुदुर्गची जनता पैसे घेऊन मतदान करते हे एकदा जाहीर करुन टाक,” असे ते म्हणाले.
वैभव नाईक यांचे गंभीर आरोप
वैभव नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत याविषयी भाष्य केले. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारानंतर अनेक गोष्टी बाहेर येत आहेत. मुर्तीकार आपटे यांना आतापर्यंच २६ लाख रुपये पोच झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या नौसेना दिन आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन मधून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यातील दोन कोटी रुपये नौसेने घातलेल्या मंडपासाठी खर्च करण्यात आले, खरंतर आमच्या माहिती प्रमाणे डबल पैसे खर्च झाले आहेत. भारतीय नौसेनेने यावर स्पष्टीकरण दिले पाहिजे. साडेपाच कोटीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. या भ्रष्टाचारातून मिळालेले पैसे नारायण राणेंच्या निवडणुकीच्या वेळी मतदारांना वाटण्यासाठी वापरले. याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा नियोजनाच्या भ्रष्टाचाराविरोधात याचिका दाखल करणार आहे. निलेश राणे यांनी पुतळा पडण्यामध्ये माझ्यावर आरोप लावले, माझ्या विरोधात पाच-सहा दिवसात पुरावे देणार होते ते कुठे गेले?” असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हे ही वाचा:
महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करायची असेल तर मत मागायला तिकडे जा: Amol Kolhe
लोकांना घरापासून वंचित ठेवण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी केले: Shrikant Shinde