आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्ष कसून तयारीला लागल्याचे दिसत आहे. सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांचे राज्यभर दौरे, बैठका आणि चर्चा सुरु असून विधानसभेसाठी रणनीती आखण्याचे काम जोरात चालू असल्याचे दिसतात आहे. अश्यातच, आज (सोमवार, २३ सप्टेंबर) काँग्रेसचे राज्यातील प्रमुख नेते चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांच्या काँग्रेस कमिटीची बैठक आज पार पडली आहे. यावेळी, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली असता नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन,’ असे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “पंतप्रधान झालो तर पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करेन, डॉ. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असे नरेंद्र नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली विदर्भाच्या भूमितूनच सांगितले होते. शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पण त्यानंतर मात्र मोदींनी, हे तर चुनावी जुमले होते, असे म्हणत पलटी मारली. शेतकऱ्यांविरोधात तीन काळे कायदे आणून शेतकऱ्यालाच उद्ध्वस्त करायचे धोरण मोदी व भाजपाने आणले होते. शेतकऱ्यांना आंदोलनजीवी, खलिस्तानी, नक्षलवादी, अतिरेकी म्हणून त्यांचा अपमान केला. आता निवडणुका आल्या म्हणून मोदींना शेतकऱ्यांची आठवण आली.”
“वर्ध्याच्या सभेत मोदी म्हणाले की, शेतकरीच पोशिंदा आहे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, सोयाबिनला १० हजाराचा भाव देऊ असे सांगितले. विरोधी पक्षात असताना भाजपाने सोयाबिनला ६ हजार रुपये भाव मिळावा म्हणून मोर्चा काढला होता आणि सत्तेत आहेत तर ४ हजार रुपये भाव देत आहेत. खतांचे भाव वाढले, डिझेलचा भाव वाढला, बि, बियाणांचा भाव वाढला पण शेतमालाचा भाव काही वाढला नाही. भाजपा शेतकरी विरोधी आहे. राज्याच्या ७६ टक्के भागात दुष्काळ आहे, अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे पण भाजपा सरकारने तेलंगणाला ४ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले परंतु महाराष्ट्राला मात्र फुटकी कवडीही दिली नाही. केंद्र व राज्यातील भाजपा सरकार जाणिवपूर्वक शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. भाजपा युती सरकार सर्व आघाड्यांवर फेल आहे पण भ्रष्टाचारात मात्र अग्रेसर आहे.” असेही पटोले म्हणाले.
विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीला लोकशाही व राज्यघटना वाचवण्यासाठी जनतेने मतदान केले. भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीवर जनतेमध्ये जो रोष होता तो त्यातून व्यक्त करण्यात आला. महायुती सरकारची जडण घडणच भ्रष्टाचारातून झाली आहे. त्यासाठी ज्या साधनांचा त्यांनी वापर केला ते जनता ओळखून आहे. सत्तेवर जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची तोडफोड केली. राज्यात शांतता सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे, महिला अत्याचार वाढले आहेत, अंमली पदार्थांचा काळा धंदा वाढला आहे. सत्ताधारी पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गोळीबार करतो. जमीन व्यवहारातून सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. सरकारी पैशाची उधळपट्टी सुरु आहे असे हे भ्रष्ट सरकार घालवण्याची जनतेची इच्छा आहे. लोकसभेपेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळेल व मविआ सत्तेवर नक्की येईल,” असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय