Akshay Shinde Encounter: राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमध्ये आदर्श विद्यामंदिर शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवार २३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. या घटनेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आरोपी अक्षय शिंदे याला दुसऱ्या गुन्ह्यातील चौकशीसाठी ठाणे क्राईम ब्रांचकडून तळोजा कारागृहातून ठाणे येथे घेऊन जात होते. यादरम्यान आरोपी अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावली. आरोपीने बंदुकीतून तीन राउंड फायर केल्या. यादरम्यान झालेल्या झटापटीत एक पोलीस कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर अक्षय शिंदेला कळवा येथील शासकीय रुग्णालयात आणले असता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणामुळे आता राजकीय वादाला सुरुवात झाली असून मनसेचे राजू पाटील (MNS Raju Patil) यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर!’ असे म्हटले आहे.
बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी गोळ्या झाडून एन्काऊंटर केला. कोणी कितीही काहीही बोललं तरी आमच्या सर्वांच्या मनात हेच आहे, त्याने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला अखेर मिळालीच आणि आमच्या चिमुकल्यांना न्याय मिळाला. ठाणे पोलिसांचे मनापासून अभिनंदन! खरंतर याचा चौकात चौरंग करायला हवा होता. या प्रकरणावरून आता विरोधकांनी या गोष्टीचे राजकारण करू नये, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण विभागाचे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.
माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या अक्षय शिंदे या नराधमाच्या एन्काऊंटरप्रकरणी विरोधकांनी थोडेतरी तारतम्य बाळगले पाहिजे अशा शब्दांत कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीने पोलिसांची बंदूक हिसकावून त्यांच्यावरच गोळीबार केला. त्यावेळी स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे मारला गेला असून या प्रकरणी विरोधकांनी राज्य सरकारला संशयाच्या भोवऱ्यात उभे केले आहे. त्यावर आमदार विश्वनाथ भोईर यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरत हे बोल सुनावले आहेत.
हे ही वाचा:
नवरात्रौत्सवात उपवास करताय ? मग कोणत्या गोष्टी खाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात हे जाणून घ्या…