लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा सोमवार २३ सप्टेंबर २०२४ रोजी संध्याकाळी पोलिसांशी झालेल्या चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर राजकीय वातावरण तापल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर (Adarsh Vidyamandir Badlapur) या शाळेत लहान मुलींवर केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. अशातच, आता अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केलेल्या पोस्टवर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे.
कोणाच्या मनात जरी आता घाणेरडे विचार आले तरी ही घटना आठवल्यानंतर माणूस धाडस करणार नाही, म्हणून अशा घटना घडणं गरजेचं असल्याचे मत माजी खासदार डॉ. निलेश राणे (Nilesh Rane) यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी केवळ एका ‘एन्काऊंटर’ने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धूळफेक असल्याचे मत व्यक्त केले. त्यावर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आरोपीला फाशी द्या म्हणणारे हेच आणि एन्काऊंटर झाला तरी खरा न्याय मिळाला नाही सांगणारे हेच असे प्रत्युत्तर दिले आहे. यासोबतच, निलेश राणे सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले की, मी तर म्हणतो असे अजून दहा-पंधरा ठोकले तरी काय हरकत नाही पण बलात्काराच्या घटना कायमच्या बंद झाल्या पाहिजे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
केवळ एका ‘एन्काऊंटर’ने न्याय मिळाला असं कोणाला वाटत असेल तर ही मोठी धूळफेक आहे. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात गेल्या ६ महिन्यात २१३ माता भगिनींवर अत्याचार झाले आहेत. बदलापूर प्रकरणाला आरोपीवर गुन्हा नोंदवताना झालेली चालढकल, इतर गुन्हेगारांचे अद्याप मोकाट असणे ही पार्श्वभूमी देखील आहे. बदलापूरच्या एन्काऊंटर प्रकरणाची न्यायालयाच्या निगराणीखाली सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
नेमकं काय घडलं होतं?
सुरुवातीला अक्षय शिंदे याने स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचे समजले होते. परंतु पोलिसांबरोबर झालेल्या झटापटीत पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती समोर येताच राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावर भाष्य करत पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच, याप्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणीदेखील विरोधकांकडून करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय