Akshay Shinde Encounter: बदलापूर येथील शाळकरी अल्पवयीन झालेल्या लैंगिक अत्याचारप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर (Akshay Shinde Encounter) केल्याची घटना काल (सोमवार, २३ सप्टेंबर) घडली. आरोपीला तळोजा कारागृहातून बदलापूकडे घेऊन जात असताना आरोपीने पोलिसांकडून पिस्तूल हिसकावत तीन राउंड फायर केले. यादरम्यान पोलिसांनी सेल्फ डिफेन्ससाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केला. यात त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली असून राजकीय नेत्यांच्या यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. परंतु आता यावरून सत्ताधारी आणि विरोधकामाध्ये चांगलीच खडाजंगी रंगल्याचे दिसू लागले आहे. शिवसेना उबाठा प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogavale) यांच्यात यावरून जुंपली असल्याचे दिसत आहे.
संजय राऊत यांनी आज (मंगळवार, २४ सप्टेंबर) पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली होती. “एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला आणि आता जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर करेल,” असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर टीका केली होती त्यावर आता भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले असून “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एन्काऊंटर करायला संजय राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील,” असे भाष्य केले आहे. त्यामुळे हा वाद आता आणखी रंगण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
काय म्हणाले भरत गोगावले?
भरत गोगावले यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एन्काऊंटर करायला संजय राऊत यांना सात जन्म घ्यावे लागतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गरीबांचे मसीहा आहेत. हे जनतेने स्विकारले आहे त्यामुळे संजय राऊतच्या पोटात दुखत आहे. अक्षय शिंदेने केलेले कृत्य पाहता तो जर बाहेरच्या देशात असता तर त्याला तिथल्या तिथे गोळ्या घालून ठार केले असते. संजय राऊतचे डोकं फिरले आहे. त्याला ठाण्यातील मेन्टल हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागेल,” अश्या शब्दात त्यांनी संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत यावेळी म्हणाले, “शंका घ्यावं असा हा प्रकार आहे, एखादा अपवाद वगळता एन्काउंटर खर नसतं. ही घटना घडली तेव्हा बदलापूर मधील जनता रस्त्यावर उतरली होती. आरोपीला आमच्या हातात द्या ही मागणी तेव्हा जनतेची होती. तेव्हा गृहमंत्री अस करता येणार नाही म्हणून सांगितले. ज्याचा एन्काउंटर झाला तो आणि संचालक असे हे रॅकेट आहे. एन्काउंटर खरं आहे का नाही हे जनतेला माहिती आहे.”
ते पुढे म्हणाले, “राज्यात आणि देशात असे अनेक एन्काउंटर आम्ही पाहिले आहे. मला जितका अंडरवर्ल्ड माहिती आहे तेवढा गृहमंत्री आणि एन्काउंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही. आरोपीने आपल्या जवाबात काही खुलासे केले होते म्हणून त्याचा एन्काउंटर झाला. कुणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत. एका शिंदे ने दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर केला आणि आता जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काऊंटर करेल,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा साधला होता.
हे ही वाचा:
अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर… पोलिसांची पहिली पत्रकार परिषद म्हणाले…