आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आता सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचे दिसून येत आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असून सर्वच पक्षातील वरिष्ठ नेते राज्यभर दौरे, बैठका आणि सभांचा धडाका लावत असल्याचे दिसत आहे अश्यातच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कालपासून (मंगळवार, २४ सप्टेंबर) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. मराठवाडा विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर येथे काल त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच, आज (बुधवार, २५ सप्टेंबर) ते नाशिक आणि कोल्हापूर येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संवाद साधणार आहेत. यावरून आता शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी अमित शहांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
भारतीय जनता पार्टी व भारताचे गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून काल ते छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर आले असता त्यांनी एमजीएम कॅम्पस येथे भाजप कार्यकर्त्यांचा कार्यकर्ता संवाद बैठक घेतली असून या बैठकीला मराठवाड्यातील भाजप आमदार, खासदार व नगरसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांकडून राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत आपली कामगिरी चांगली झाली नाही परंतु निराश होण्याची गरज नाही. भाजपने लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या एकूण जागांपैकी ५० टक्क्यांपेक्षा जास्त जागा जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत भाजपची विदर्भातील कामगिरी महत्वाची असून विदर्भात चांगले यश मिळते तेव्हा भाजपची सत्ता येते,” असे ते म्हणाले. तसेच विदर्भात ४५ आणि मराठवाड्यात ३० जागा जिंकण्याचे टार्गेत त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिले आहे.
अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून राज्यातील राजकीय वातावरण गरम झाले आहे. यावरून विरोधकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. यावर बोलताना संजय राऊत यांनी आज (बुधवार, २५ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,उत्तर प्रदेश , मणिपूर , लडाख सोडून, देशातील विविध राज्यातील कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रात आढावा घेत आहे ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माणिपूर सीमेवर, लडाख मध्ये आढावा घेतला नाही. देशात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत पण त्याचा आढावा नाही. पण गृहखात्याचे विमान घेऊन केवळ पक्षाचा आढावा घेण्यासाठी येत आहेत. अमित शहांच्या दौऱ्यात प्रशासनाला दम देण्याचे काम केले जाईल. अमित शहा येतात तेव्हा राज्यातील उद्योग बाहेर पडतो. नाशिककरांनी सावध राहावं. शिवसेनेला धोका कोणी दिला अमित शहा जाणतात. शिवसेनाप्रमुखांच्या पवित्र खोलीत चर्चा झाली, पण धोका दिला परंतु लोकसभेत जनतेने भाजपला दाखवून दिले,” असे ते यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…
Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?