Shardiya Navratri 2024 : गणेश उत्सवाचा जल्लोष संपताच पुन्हा तयारी सुरु होते ती नवरात्रौत्सवाची. हा उत्सव वर्षानुवर्षे साजरा केला जात आहे. या नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवात आदिशक्तीची पूजा अर्चा केली जाते. त्यामध्ये मग आरती, गरबा, उपवास किंवा बऱ्याच व्रतांचा समावेश असतो. पण नवरात्रीचा हा उत्सव नऊ दिवस का साजरा केला जातो यामागील नेमकी आख्यायिका काय आहे हे ठाऊक आहे का ?
महिषासुर नावाचा एक बलशाली राक्षस होता. त्याला अमरत्वाचे वरदान हवे होते त्यासाठी त्याने ब्रह्मदेवांची घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येवर ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन त्याला सांगितले की, तुला हवं ते वरदान मागू शकतो. महिषासुराने ब्रह्मदेवांकडे अमरत्वाचे वरदान मागितले. त्याची अशी इच्छा ऐकून ब्रह्मदेव त्याला म्हणाले, ‘या जगात ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे जीवन-मरण सोडून जे हवे ते मागतात.’ त्यावर महिषासुर म्हणाला, “ठीक आहे प्रभू, मग मला असे वरदान द्या की, मी कोणत्याही देवतेच्या हातून, राक्षसाच्या हातून किंवा मनुष्याच्या हातून मरणार नाही. माझे मरण स्त्रीच्या हातून व्हावे.’ त्याच्या अश्या मागणीवर ब्रह्मदेव तथास्तु म्हणून तिथून गेले.
त्यानंतर महिषासुर राक्षसांचा राजा झाला आणि त्याने देवांवर हल्ला केला. देवांनी एकजुटीने त्याचा सामना केला ज्यात भगवान शिव आणि विष्णू यांनीही साथ दिली पण देवांचा यात पराभव झाला. शेवटी महिषासुराने देवांवर राज्य केले. त्यानंतर सर्व देवांनी महिषासुरापासून बचाव व्हावा यासाठी आदिशक्तीची आराधना करण्यास सुरुवात केली. तेव्हा तिथे एक दिव्य प्रकाश निघाला ज्याने दुर्गा देवीचे सुंदर रूप धारण केले. दुर्गादेवीच्या सुंदर रूपावर भाळून महासुराने देवीशी विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. दुर्गा देवीने त्याचा हा प्रस्ताव मान्य केला मात्र एका अटीवर. तिने महिषासुराशी युद्ध करण्याची अट ठेवली. ती अट महिषासुराने मान्य केली आणि हे युद्ध सुरु होऊन नऊ दिवस चालले. दहाव्या दिवशी दुर्गा देवीने महिषासुराचा वध केला. तेव्हापासून हा नवरात्री उत्सव साजरा केला जाऊ लागला.
हे ही वाचा:
अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रामदास आठवले यांची पहिली प्रतिक्रिया, संजय राऊतांवर बोचरी टीका करत म्हणाले…
Akshay Shinde चा घात की घातपात? एन्काऊंटरची स्क्रीप्ट कोणाची?