Chhatrapati Shivaji Maharaj : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने मोठा वाद निर्माण झालाय. नौदल दिनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ३५ फुट्याच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ रोजी शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं होतं. पण अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा कोसळला. हा पुतळा २६ ऑगस्टला दुपारी १ च्या सुमारास अचानक कोसळला. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. या घटनेमुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली. विरोधक राज्य सरकारवर तुटून पडले. याच प्रकरणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असताना या प्रकरणी माफी देखील मागितली आहे. परंतु या मुद्यावरून प्रतिक्रिया येणं काही मात्र थांबत नाहीय. या सगळ्या प्रकरणावर सामान्य जनतेपासून ते कलाविश्वातील अनेकपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्तही करण्यात आला. पण या सगळ्यात दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या शब्दांनी परिस्थितीचं गांभीर्य पुन्हा एकदा लक्षात आणून दिलं.
दिग्पाल लांजेकर यांची कविता –
गलबलला दर्या,
त्याचे अश्रू कुणा दिसेना
बाप कोसळता माझा,
वेदना उरी ती मावेना
चूक कुणाची कुणाची,
सारे भांडती भांडती
पण भाव स्वराज्याचा,
बघा सारेच सांडती
रे माझ्या बापा शिवराया
तुमच्यासाठी उरे काया
नको मूर्ती ती लौकिक
नको स्मारक भौतिक
देवा शक्ती द्या लेकरा
तव कवतिक सांगाया
तव पराक्रमाचा तो
दीप लागू दे तेवाया
श्वास माझा हो संपू दे
तुमची स्मृती ती कोराया
मनामनाच्या अंतरी
तुमची मूर्ती साकाराया
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावर आधारित सिनेमांचं अष्टक काढून दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) यांनी प्रेक्षकांसमोर महारांजाचा इतिहास सादर केला. फर्जंद, फत्तेशिकस्त, पावनखिंड, सुभेदार,शेर शिवराज या सिनेमांमधून त्यांनी छत्रपतींचा इतिहास सांगितला आहे.
हे ही वाचा: