किरण माने हे सामाजिक, जागतिक आणि राजकीय विषयांना घेऊन त्यांचे मत मांडत असतात. शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर अभिनेते किरण माने यांनी अनेक राजकीय विषयांना वाचा फोडली. किरण माने नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील व्यक्तींबद्दल लिहीत असतात. त्याचप्रमाणे त्यांनी आज त्यांनी सुप्रसिद्ध मराठी कथाकार शंकर पाटील यांच्याबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
काय आहे किरण माने यांचं ट्विट?
शंकर पाटील! मराठी साहित्यविश्वाचा अनभिषिक्त सम्राट. मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळातलं मौल्यवान रत्न! शंकर पाटलांनी लिहीलेल्या मर्हाटमोळ्या मातीतलं अस्सल जगणं दाखवणार्या खुमासदार कथा… फक्कड ग्रामीण बोलीचा तडका असलेले खुसखुशीत संवाद… सगळंच नादखुळा होतं. त्यांच्यानंतर वसंत सबनीस वगळता त्या तोडीचं लेखन असलेले ग्रामीण सिनेमे परत कुणी लिहीले नाहीत.
‘पिंजरा’ हा मराठीतला माईलस्टोन लिहीला पाटलांनी! केला इशारा जाता जाता, एक गाव बारा भानगडी, डोंगरची मैना, छंद प्रीतीचा, भोळीभाबडी, पाहुणी, लक्ष्मी अशा एकसो एक सिनेमांतून ग्रामीण राजकारण, समाजकारण, शेतकरी-कष्टकर्यांचं जगणं, तमाशा-गोंधळ-वासुदेव-कडकलक्ष्मी सारख्या अनेक लोककला… थोडक्यात काय, तर खर्याखुर्या मराठी मातीतला अनमोल खजिना पडद्यावर आणून महाराष्ट्राचे डोळे दिपवणारा हा महान लेखक!
धिंड, नाटक, मिटींगसारख्या शेकडो धम्माल कथा… ‘टारफुला’ सारखी ग्रामीण जीवनाचं विदारक दर्शन घडवणारी अभिजात कादंबरी… असा अफाट अनमोल ठेवा लिहून मायमराठीला समृद्ध करणारे शंकर पाटील माझ्या कायम काळजाच्या जवळ राहीलेत. यांच्या कथा वाचत आणि यांनी लिहीलेले सिनेमे बघत मी लहानाचा मोठा झालोय. परवा कोल्हापुरातल्या ‘तिसरी घंटा’ या नाट्यसंस्थेच्या वतीनं उद्या ‘शंकर पाटील स्मृती महोत्सव’ साजरा होतोय. यात मी शंकर पाटील यांच्या ‘जुगलबंदी’ या भन्नाट कथेचं अभिवाचन करणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातले कलाकार ‘नाटक’ या कथेचं अभिवाचन आणि ‘पाळणा’ या कथेचा नाट्याविष्कार सादर करणार आहेत. कोल्हापुरकरांनो, ३१ तारखेला संध्याकाळी ६ वाजता, राम गणेश गडकरी सभागृहात… तुमची वाट बघतोय… नक्की या! असे म्हणत किरण माने यांनी कोल्हारपूरवासियांना आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
Congress ला मोठा मिळणार फटका; JItesh Antapurkar करणार BJP मध्ये एन्ट्री