राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर इतर पक्षात आणि छोट्यामोट्या गटात नाराजीचे वारे सुरू झाले. प्रथम भाजप, राष्ट्रवादी, कॉग्रेस इतर पक्ष आणि आता मनसेमध्येही नाराजीचे सूर उमटत असल्याचे दिसून आले आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे गटाध्यक्षांचा मेळावा घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार असतानाच मनसेतील नाराजीची चर्चा रंगू लागली आहे. मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे पुन्हा नाराज झाल्याची चर्चा आहे. मनसेचे नेते वसंत मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आलं. परंतु त्यांना भाषणच करू दिलं नसल्यामुळे मोरे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
मनसे नेते वसंत मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमाला बोलावण्यात आले होते. मात्र त्यांना भाषणच करू देण्यात आले नाही. त्यामुळे मोरे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. या चर्चेमुळे मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटतट आणि वाद विसरून एकदिलाने निवडणुकीला सामोरे जाण्याची सूचना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा न पटल्याने वसंत मोरे नाराज होते. तेव्हापासून शहर मनसे पदाधिकारी आणि वसंत मोरे यांच्यातील विसंवाद सातत्याने पुढे आला आहे. स्थानिक पदाधिकारी डावलत असल्याचा आरोप मोरे यांनी केला होता. राज ठाकरे पक्ष कार्यालयात येतील तेव्हाच कार्यालयात जाईन, अशी भूमिका मोरे यांनी जाहीर केली होती. त्यात या नव्या वादाची भर पडली आहे.
View this post on Instagram
“मी नाराज नाही. माझे कार्कर्ते नाराज आहेत. पुणे शहरात मनसेच्या शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यात कोअर कमिटीचे सदस्य होते. या मेळाव्यादरम्यान मंचावर असल्यामुळे मला बोलू द्यायला हवं होतं, अशी भावना माझ्या कार्यकर्त्यांची आहे. मला त्या मंचावर बोलण्याची संधी मिळाली नाही. तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो होतो, तुम्ही भाषण का केले नाही असे मला माझे कार्यकर्ते विचार होते. भाषण करणाऱ्यांच्या यादीमध्ये माझे नावच नव्हते. त्यामुळे मी कसे बोलणार. तेथील नेत्यांनी मला बोलू द्यायला हवे होते. माझ्यासह अनेक नेते होते. त्यांनादेखील बोलू द्यायला हवं होतं,” अशी प्रतिकिया वसंत मोरे यांनी दिली आहे.