अभिनेत्री साई पल्लवी ठरली वादाचा विषय

चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे मत व्यक्त केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे.

अभिनेत्री साई पल्लवी ठरली वादाचा विषय
दक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘विराट पर्वम’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान अभिनेत्रीने काश्मिरी पंडितांबद्दल असे मत व्यक्त केले की, त्यावरून वाद सुरू झाला आहे. साई पल्लवीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रसंगांची तुलना मॉब लिंचिंगशी केली आहे.
यानंतर आता तिच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर देखील वादविवाद सुरु झाला आहे. अनेक लोक तिच्या वक्तव्याला पाठिंबा देत आहेत. तर, काही तिच्यावर टीका करत आहेत. अभिनेत्री साई पल्लवी तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंसा आणि धर्माच्या मुद्द्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘कश्मीर फाइल्स’चा संदर्भ देताना तिने दिलेल्या प्रतिक्रियेमुळे नव्या वादाला दिशा मिळाली आहे.
अभिनेत्री साई पल्लवी आपल्या प्रतिक्रियेत म्हणाली, “या चित्रपटात काश्मिरी पंडितांची त्यावेळी हत्या कशी झाली, हे दाखवण्यात आले आहे. पण, त्यापलीकडे जाऊन हिंसेला धर्माशी जोडले, तर काही दिवसांपूर्वी गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीलाही बेदम मारहाण करून जय श्री रामचा नारा देण्यास सांगितले. या दोन घटनांमध्ये काय फरक आहे ?” तिच्या या प्रतिक्रियेवर प्रेक्षक देखील वेगवेगळी मतं मांडताना दिसत आहेत.
Exit mobile version