छोट्या पडद्यावरील म्हणजेच झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरताना पाहायला मिळत आहे. या मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका घराघरात लोकप्रिय झाली आहे. या मालिकेच्या कथानकानं आणि मालिकेमधील कलाकारांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेत बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका मायरा वायकुळने (Mayra Vaikul) साकारली आहे. या सर्व कलाकारांनी मालिकेतील अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजवलं. तसेच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे, प्रदीप वेलणकर या कलाकारांमुळे मालिकेला चार चांद लागले आहेत. मात्र आता लवकरच ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून सिंगल मदर असलेली नेहा आणि तिची मुलगी परी यांच्या आयुष्यात येणारा श्रीमंत उद्योजक यशवर्धन यांची कथा दाखवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत नेहाचा पहिला पती अविनाश हा परत आला आहे. त्यामुळे नेहाच्या आयुष्यात तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परीचा ड्रायव्हर हाच नेहाचा पहिला नवरा अविनाश असल्याचं सत्य यशसमोर आल्याने आता या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. नेहाने हे सत्य लपवून ठेवल्याचा धक्का यशबरोबरच चौधरी कुटुंबाला बसला आहे. एकीकडे अनेक ट्विस्ट येत असताना दुसरीकडे ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे.
नुकतंच झी मराठीच्या एका नव्या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मालिकेचं नाव ‘दार उघड बये’ असं आहे. दार उघड बये या मालिकेच्या प्रोमोमध्ये अभिनेते शरद पोंक्षे दिसत आहेत. तसेच या मालिकेचे कथानकही हटके असणार आहे, असा अंदाज प्रोमो पाहून लावला जाऊ शकतो. ही मालिका १९ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळेच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद होणार असल्याचे बोललं जात आहे. यानंतर या मालिकेच्या अनेक चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी ही मालिका बंद करु नये, अशा कमेंटही केल्या आहेत. या नव्या मालिकेमुळे ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेची वेळ बदलणार की ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे मात्र अजून अधिकृत जाहीर झालेलं नाही.
‘दार उघड बये’ या मालिकेचा प्रोमो आल्यापासून ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका बंद होण्याची जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका निरोप घेणार अशीही चर्चा सुरु होती. पण त्या मालिकेतही अनामिकाच्या नवऱ्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे जर नवीन मालिका ८.३० वाजता प्रसारित केली जाणार असेल तर या वेळेत सध्या प्रसारित होणारी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका बंद करणार की तिची वेळ बदलणार असा विचार प्रेक्षक करत आहेत. दार उघड बये ही मालिका १९ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होईल, अशी चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे.
हे ही वाचा :-
गणेशोत्सवानिमित्त मुख्यमंत्री राज ठाकरेंच्या घरी जाणे औपचारिकता की, मनपासाठी नवीन समीकरण?
डॉन दाऊदची माहिती देणाऱ्याला एनआयए कडून मोठ्या रकमेचं बक्षीस जाहीर