छत्रपतींंचा आशिर्वाद ‘चलो चले मोदी के साथ’ देऊन देशात आणि राज्यात सत्तेत आलेल्या भाजपा (BJP) ने छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हाच विषय घेऊन पुन्हा विधानसभेला सामोरे जायचे ठरवले असावे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाच्या विषयाला भाजपाने हात घातला आहे. मालवण (Malvan) मधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आणि राज्यात राजकीय रणकंदन माजले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना भिडले आहेत. तर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी माफी मागून या विषयावर सरकारच्या बाजूने पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हाच विषय घेऊनच लढल्यास भाजपाला फायदा होईल असे आडाखे बांधले जात आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाच्या पुस्तकाचे पान अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उघडले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत (Surat) लूटली नाही. काँग्रेस (Congress) ने देशाला खोटा इतिहास सांगितला असे विधान करुन देवेंद्र फडणवीस यांनी हा नवा विषय उकरून काढला. वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान अनावधानाने किंवा कोणतेही कारण नसताना नक्कीच केलेले नाही. या मागे भाजपाची राजकीय रणनीती आहे, असे जाणकारांचे मत आहे. पुतळा कोसळल्यानंतर सरकारवर जोरदार टीका झाली त्यामुळे सरकार अडचणीत आले. पुतळ्याचा शिल्पकार अजूनही फरार असून गृहखात्याची याबाबत भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासावरुन नवा वाद भाजपा निर्माण करु पाहत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरत लूटली, तिथल्या व्यापाऱ्यांकडील संपत्ती एकदा नाही दोन वेळा लूटली हे इतिहासात पुराव्यानिशी सिध्द झाले आहे. पण ही लूट नव्हती तर स्वराज्याचा जो खजिना छत्रपती शिवाजी महाराज यांनी परत आणला असा इतिहास देवेंद्र फडणवीस आता सांगत आहेत. हा इतिहास चूकीचा आहे असे सांगताना देवेंद्र फडणवीस यांनी कुठल्याही इतिहासकाराला जबाबदार धरलेले नाही. त्यांनी काँग्रेसकडे बोट दाखवले आहे. यावर काँग्रेसने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पुस्तकाचा दाखला देऊन भाजपाचे आवडते इतिहासकारसुद्धा सुरत लूटली असेच सांगत आहेत, याबाबतची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी स्पष्ट केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर पुन्हा राजकीय गोंधळ सुरु झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या इतिहासात असे अनेक वादाचे मुद्दे आहेत. अनेक मुद्यावरुन इतिहासकारांमध्ये मतमतांतरे आहेत. त्यामुळे बहुतेक भाजपाने या इतिहासातील वादच पेटवायचे ठरवलेले दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु कोण? संत रामदास त्यांचे गुरु होते का? छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख कोणती? छत्रपती शिवाजी महाराज यांची आणि तुकाराम महाराज यांची भेट झाली होती का? तुकाराम महाराज यांना त्यांनी गुरु मानले होते का? अफजलखानाच्या वधाच्या वेळी वाघनखे वापरली होती का? अशा अनेक विषयांवरून इतिहासकारांमध्ये वाद आहेत. ते उकरून काढून भाजपा हा विषय गरम करणार की काय? असे चित्र दिसू लागले आहे. या मागे नक्कीच भाजपाने राजकीय मतांची गणिते मांडून इतिहासाच्या पुस्तकाला अशा पद्धतीने “गणिताचे कव्हर” घालण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
हे ही वाचा:
Mukhyamantri Majhi Ladki Bahin सन्मान यात्रेला उदंड प्रतिसाद, Worli विधानसभेतून भरले ‘इतके’ अर्ज