आपल्या शत्रूला नामोरहम करण्यासाठी एका राजाने शत्रूच्या गटातील त्याच्या जवळच्या माणसाला फोडले आणि आपण जिंकल्याचा आनंद साजरा केला…पण त्यातील सत्य हळूहळू जेव्हा कळू लागले तेव्हा आपण हे काय करुन बसलो याचा त्याला पश्चाताप झाला. कारण ज्या माणसाला त्याने आपल्या गटात घेतले तो कधी एकदा जातोय याची वाट बघत त्याचा मूळ मालक बसलेला असतो. त्यामुळे त्याच्या जाण्याने ब्याद गेली असं म्हणणाऱ्या मूळ मालकाचा फायदाच झाला..ही गोष्ट अजून पुर्ण झालेली नाही. त्यामुळे ती मी पुर्ण सांगितली नाही, जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ज्याने या माणसाला आपल्या गटात घेतले तो स्वत:चे केस उपटत फिरत असू शकतो..यातील विनोदाचा भाग सोडला तर हे कशाबद्दल आणि कुणाबद्दलच वर्णन आहे हे लक्षात आले असेल. महाराष्ट्राच्या राजकारणातील दादा..राजकीय वर्तुळात ज्यांचा प्रचंड दबदबा होता, मंत्रालयातील अधिकारी ज्यांना अत्यंत सिरियस घ्यायाचे असे दादा आज भाजपासोबत गेले आणि त्यांची अवस्था काय झालेय यापेक्षा भाजपाची अवस्था असून अडचण आणि नसून खोळंबा अशी झाली आहे.
उपमुख्यमंमत्री अजितदादा अनंतराव पवार यांना भाजपाने आपल्यासोबत घेतले त्याचा प्रचंड फटका भाजपाला लोकसभा निवडणुकीत पडला. भाजपाच्या हक्काच्या मतदारांनीही भाजपाला फटकारले तसेच निकालानंतर भाजप समर्थकांनीही फटकारले. तसेच भाजपाच्या मातृसंस्थेनेही या मुद्दयावर तीव्र नाराजी व्यक्त केली जर अजित पवारांची राष्ट्रवादी सोबत राहिली तर येत्या विधानसभेत आपलं काही खरं नाही हे आता पर्यंत भाजपाच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता दादांचे करायचे काय यावर भाजपामध्ये चिंतन सुरू आहे. दुसरीकडे शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट या निर्णयावरुन भाजपावर पहिल्या दिवसापासूनच नाराज आहे. त्यामुळे दादांना जर भाजपाने सोडले तर त्याचा फटका भाजपालाच बसणार आहे तर दादांना सोबत घेतले तरीही फटका बसणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
अजितदादांनी नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतली. त्यामध्ये अमित शाह यांनी जो कानमंत्र दादांना दिला ते ऐकून दादा एकदम गारच पडले आहेत. त्यामुळे त्यांना थोडी मायेची उब देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बुधवारी सायंकाळी त्यांच्या देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दंडित करण्यासाठी अजित पवार आणि त्यांच्या गटाला फोडून भाजपाने नवी मोट बांधली खरी पण त्या मोटेसोबत भाजपाला स्वत:च बुडायची वेळ आली आहे. आता पाणी गळयापर्यंत आले आहे. विधानसभा केवळ ९० दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मनात मुख्यमंत्री पदाची आस धरुन आलेले अजित पवार आणि त्यांचे आमदार यांना सांभाळता सांभाळता भाजपाच्या नाकी नऊ झाले आहेत. त्यामुळे विधानसभेत आता यांचे करायचे काय यावर भाजपा चिंतेत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही या प्रकरणी तुम्ही केले ते तुमचे तुम्ही निपटा असे भाजपाला सांगून हात झटकले आहेत.
राज्यात पेटलेला मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न… त्यात भाजपाला सर्व बाजूनी घेरले जात असताना खरं तर अजित पवारांचा भाजपाला फायदा होईल असे वाटले होते. पण भाजपचे हे सामाजिक गणितही चुकले. त्यामुळे राजकीय, सामाजिक पटलावर दादांना घेऊन सर्व गणिते चुकवून बसलेल्या भाजपाचे नेते सध्या दिवसरात्र कॅक्युलेटर घेउन नवनविन आकडेमोड करीत असले आहेत. हे गणित बरोबर येईल असे नविन कॅक्युलेटर कंपनीने तयार करावे, याची ऑर्डर भाजपाकडून देण्यात आली असून भाजपाचे नेते अतुल शाह चोर बाजारातही त्यासाठी जाऊन आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे.
Raj Thackeray यांनी विधानसभा निवडणुकांसाठी कसली कंबर ; पदाधिकारी मेळाव्याचे केले आयोजन
मुंबईतील अटल पुलावरून उडी मारून अभियंत्याची आत्महत्या, जाणून घ्या का उचलले हे पाऊल?