हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात. एक शुक्ल तर दुसरी कृष्ण पक्षात येते. वर्षभरात एकूण २४ एकादशी येतात. एकादशी तिथी ही श्री हरी विष्णूला समर्पित आहे. वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीचे एक वेगळे वैशिट्य आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीच्या तिथीला विशेष महत्त्व आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी, प्रबोधिनी एकादशी किंवा आषाढी एकादशी असेही ओळखले जाते. आज आपण आषाढी एकादशीचे महत्त्व, तिथी आणि शुभ मुहूर्त याबद्दल माहिती जाणून घेऊया.
आषाढी एकादशीपासून श्री हरी विष्णू हे ४ महिने क्षीरसागरात विसावतात. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. त्यानंतर चार महिन्यांनी देवूठानी एकादशी येते. या एकादशीला श्री हरी झोपेतून जागे होतात. देवूठानी एकादशीपासून हिंदू धर्मात शुभ आणि मंगल कार्याला सुरुवात होते. आपल्याकडे महाराष्ट्रात वारकरी मंडळी एक महिना आधीपासूनच आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपुराकडे येण्यासाठी प्रस्थान करतात. हिंदू पंचांगानुसार आषाढी एकादशी तिथी ही मंगळवार, १६ जुलै २०२४ रोजी रात्री ०८ वाजून ३३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर बुधवार, १७ जुलै २०२४ रोजी रात्री ०९ वाजून ०२ मिनिटांनी समाप्त होईल. यंदा १७ जुलै रोजी देवशयनी एकादशीचे व्रत केले जाईल. तर देवशयनी एकादशीच्या व्रताचे पारणाची १८ जुलै २०२४ ला होईल. या दिवशी व्रत पारणाची शुभ वेळ ०५ वाजून ३४ मिनिटे ते ०८ वाजून १९ मिनिटापर्यंत असेल.
आषाढी एकादशीच्या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करायचा असतो. विष्णूच्या अथवा विठ्ठलाच्या मूर्तीची मनोभावे पूजा करायची असते. व्रतकर्त्याने ब्रम्ह मुहूर्ताला उठून स्नान करून घ्यावे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघरात दिवा लावून व्रताचा संकल्प करावा. श्री हरी विष्णूंचा गंगाजलाने अभिषेक करा. पूजेदरम्यान विष्णूला फुल आणि तुळशीपत्र अर्पण करावे. या दिवशी श्री विष्णुसह देवी लक्ष्मीची पूजा करावी. भगवंताला नैवेद्य अर्पण करून आरती करावी.
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.