धनतेरस, किंवा धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2022) ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात. दिवाळी (Diwali Festival) सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे.
धनत्रयोदशी कथा :-
धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे. कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुख उपभोगावीत म्हणुन राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्यास झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या जगात(यमलोकात) परततो. अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दक्षिणाभिमुख दिवा लावतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यू टळतो अशी भावना हा दिवा लावण्यामागे आहे.
धनत्रयोदशीबद्दल आणखी एक कथा : –
धनत्रयोदशीबद्दल अजून एक दंतकथा आहे. इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी देवी लक्ष्मी प्रगट झाली. त्याच वेळी समुद्रातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला. म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते. म्हणून या दिवसास धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
सायंकाळी कणकेच्या पिठाचा दिवा करून दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करावा. या विधीस यमदीपदान असे म्हणतात.
– श्री रवींद्र भगवान पाठक गुरुजी , ठाणे .
हे ही वाचा:
मुकेश अंबानीच्या पुत्राने घेतली उद्धव ठाकरेंची भेट
कंत्राटी बेस्ट कर्मचारी संपावर; दिवाळी गोड करण्याची मागणी