ब्रिटिशकाळात व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा आलेल्या असताना भारतीय लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. टिळकांनी जेव्हा सार्वजनिक गणपती मंडळ स्थापन करण्याचे आवाहन केले तेव्हा ते पुण्यात होते. मात्र, सार्वजनिक गणपती मंडळे केवळ पुण्यापुरती मर्यादित राहण्यापेक्षा देशभर होणे गरजेचे होते. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईतील गिरगाव येथील केशवजी नाईक चाळ येथे मुंबईकरांनी पहिला सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. ती तारीख होती १४ सप्टेंबर १८९३ तेव्हापासून ते आतापर्यंत गिरगावातील या केशवजी नाईकांच्या चाळीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव अगदी चैतन्यमय वातावरणात साजरा होतोय. यंदा या मंडळाचं १३२वे वर्ष आहे.
लोकमान्य टिळकांनी दिलेल्या प्रेरणेतून साकारलेला हा गणेशोत्सव पाहण्यासाठी खुद्द टिळकांनी १९०१ साली मंडळाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी ‘गृहस्थाश्रम’ या विषयावर व्याख्यान दिलं होतं. त्यांच्या याच भेटीची आठवण म्हणून मंडळाने २००१ साली भेटीच्या शतकपूर्तीनिमित्त ‘टिळकांचे पुनरागमन’ हा कार्यक्रम आयोजित केला. ज्यात गिरगावमधील प्रार्थना समाजपासून केशवजी नाईक चाळींपर्यंत नऊवारी साडीतल्या महिला ,ब्रिटिशकालीन फौजदार असे पोशाख करत टिळकांची प्रतिकात्मक मिरवणूक काढण्यात आली होती.
या मंडळाचे वेगळेपण आणि वैशिष्ट्य म्हणजे आपला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपत टिळकांना अभिप्रेत असणारा गणेशोत्सव इथे साजरा होतो. गणपती बाप्पाचे आगमन, विसर्जन हे पालखी मिरवणुकीद्वारे केले जाते. बाप्पाची षोडशोपचार पूजा केली जाते. गणपतीच्या दिवसांत कीर्तन, भजन, व्याख्यानमाला असे प्रबोधनपर कार्यक्रम पार पडतात. लहान मुलांसाठी पाठांतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे दहा दिवस ज्ञानदानाचे काम अखंडपणे सुरू असते. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, कल्याणजी-आनंदजी आणि त्यासोबत अनेक दिग्गजांनीही या मंडळाला भेटी दिल्या आहेत. याचसोबत बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा केशवजी नाईक चाळ येथे भाषण केले होते. गणपती बाप्पाची मूर्ती जशी पहिल्या वर्षी होती तशीच आताही आहे. दरवर्षी दोन फूट उंचीच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. हा बाप्पा घडवणाऱ्या मूर्तिकारांची तिसरी पिढी सध्या हे काम पाहतेय.
गणेशोत्सव या शब्दातील ‘उत्सव’ हा शब्द महत्त्वाचा आहे. उत्सव हा माणसांना एकत्र आणण्यासाठी असतो, विचारांच्या देवाणघेवाणीसाठी असतो, परंपरा, संस्कृती जपण्यासाठी असतो. त्या उत्सवाचा इव्हेंट होऊ लागला की, मूळ उद्देशाला गालबोट लागू शकते. हे जपणारी काही मंडळे आजही मुंबईत आहेत आणि केशवजी नाईक गणेशोत्सव मंडळही त्यापैकीच एक आहे.