आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यावर काही दिवसातच गौरीचे आगमन घरोघरी होते. गौरीपूजन किंवा महालक्ष्मी पूजन हे हिंदू धर्मातील भाद्रपद महिन्यातील एक महत्वाचे व्रत मानले जाते. गौरीपूजन हा महाराष्ट्रातील खास सण मानला जातो. या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हंटले जाते. ज्येष्ठा गौरीचे आवाहन भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथीला असते. यंदा महालक्ष्मीचे आगमन हे १० सप्टेंबरला मंगळवारी असणार आहे. या काळात वेगवेगळ्या तयारीपासून गौराईचे आगमन हे १० सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात होईल.
ज्येष्ठ गौरी आवाहन हा महाराष्ट्रातील अनेक उत्सवांपैकी एक महत्वाचा सण आहे. गौरी म्हणजेच माता पार्वतीचा हा सण, गणेशोत्सवा दरम्यान उत्साहात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात ज्येष्ठा गौरी आवाहनाने होते आणि त्यानंतर गौरी पूजन व गौरी विसर्जनाने समाप्ती होते. तीन दिवस हा सण साजरा केला जातो. यंदा १० सप्टेंबर रोजी या सणाला सुरुवात होणार आहे जी १२ सप्टेंबर रोजी समाप्त होईल.
गौरी आवाहन तिथी
हिंदू पंचांगानुसार यंदा भाद्रपद शुक्ल पक्षाची सप्तमी तिथी ही ९ सप्टेंबरला रात्री ९ वाजून ५३ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर १० सप्टेंबरला रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार गौराईचे आगमन हे १० सप्टेंबरला मोठ्या थाटामाटात होईल. संस्कृतमध्ये गौरी म्हणजे आठ वर्षाची अनाघ्रात अशी पवित्र कन्या. तसेच गौरी म्हणजे गोरी, उज्ज्वल वर्णाची. पुराणानुसार पार्वतीचे एक नाव. भाद्रपद महिन्यात श्रीगणेशाच्या पाठोपाठ गौराईचे आगमन होते. तीन दिवस माहेरी येणाऱ्या गौरीची लगबगही सर्वत्र पाहायला मिळते.
गौरी आवाहन मुहूर्त
१० सप्टेंबर रोजी सूर्योदयापासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा गौरी आवाहनाचा शुभ मुहूर्त असेल. तसेच या दिवशी दुपारी ३ ते दुपारी ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत राहू काळ असेल. गौरीचे आगमन हे नक्षत्रानुसार होते. अनुराधा नक्षत्रामध्ये गौरीचे आगमन होते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. ९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून अनुराधा नक्षत्र प्रारंभ होईल. १० सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजून ३ मिनिटांपर्यंत अनुराधा नक्षत्राची समाप्ती होईल.
गौरी आवाहन महत्त्व
हिंदू परंपरेनुसार घरातील मुख्य द्वारापासून ते गौरी स्थापनाच्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पावलांचे ठसे काढले जातात. येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत गौरींचे मुखवटे आणतात. गौरीचे आगमन करताना ते वाजत गाजत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दूध दुभत्याची अशा गोष्टी आवर्जून दाखवतात. महाराष्ट्रातील काही भागात सुगडाच्या तर काही ठिकाणी मुखवट्याच्या गौरी बसवल्या जातात. या दिवशी ज्येष्ठा आणि कनिष्ठा या दोन्ही गौरीचे आगमन होते. हिंदी धर्मानुसार गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाच्या आईचे रूप मानले जाते.
हे ही वाचा:
गृहमंत्री अमित शाह सपत्नीक लालबाग राजाच्या चरणी लीन
वारकरी संप्रदायाकडून समाज घडविण्याचे कार्य – CM Eknath Shinde
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.