भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्दशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला आपल्या लाडक्या बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे. १० दिवस बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज दि. १७ सप्टेंबरला अखेर बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा केली जाते तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुहूर्तावर विसर्जन करणं शुभ मानले जाते.
गणपती विसर्जन करताना विसर्जनाच्या आधी गणपतीची विधिवत पूजा करावी. त्यानंतर त्यांना शेंदूर आणि अक्षता लावून इलायची, फूल, सुपारी, दुर्वा, पण, नारळ, मध, गुलाल आणि तांदूळ अर्पण करावे. देवासमोर धूप आणि दिवा लावा. तसेच लाडू, मोदक, केळे यांचा नैवेद्य गणरायाला दाखवून आरती करा. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी ३ शुभ मुहूर्त आहेत. सकाळी ६ वाजून ४ मिनिटांपासून ते सकाळी १० वाजून ४३ मिनिटांपर्यंत पहिला शुभ मुहूर्त असणार आहे. दुसरा मुहूर्त हा दुपारी १२ वाजून १६ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत असणार आहे. शेवटचा तिसरा मुहूर्त संध्याकाळी ४ वाजून ५५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत असणार आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाची भव्य मिरवणूक काढून गणपतीचं विसर्जन केलं जातं. या दरम्यान काही गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
विसर्जनादरम्यान घ्यायची काळजी:
१. समुद्रात जास्त आत पाण्याजवळ जाण्याचा प्रयत्न करु नका.
२. मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेतर्फे नेमणूक केली गेलेल्या प्रशिक्षित व्यक्तींची मदत घ्या.
३. काळोख असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाणे टाळा.
४. महानगरपालिकेने पोहण्याकरिता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.
५. समुद्रात किंवा तलावात कुणी बुडत असल्याचे नजरेस आल्यास लगेचच अग्निशमन दलाचे जवान, पोलिस किंवा जीवनरक्षकांना सूचित करा.
६. अफवा पसरवू नका किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका.
७. विसर्जन सोहळ्यावेळी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्या, त्यांना पाण्याजवळ जाऊ देऊ नका.
हे ही वाचा:
विसर्जनावेळी भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन; रात्री ११च्या सुमारास समुद्राला मोठी भरती
सणासुदीच्या दिवसात सोने चांदीची धामधूम; दरवाढीचे सत्र सुरूच…