नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये बरेचजण उपवास करतात. काही जण घटस्थापनेच्या दिवशी आणि घट उठताना उपवास करतात. तर काही जण नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास पकडतात. बरेच लोक उपवासात केवळ दूध आणि फळे खाऊन नऊ दिवस उपवास करतात. तर अनेक जण दूध, दही, फळे, ताक, खजूर, यांसारख्या पदार्थांचा समावेश करतात. त्याचबरोबर साबुदाण्याचे विविध पदार्थही बनवले जातात. पण उपवासाला नेहमीचे तेच पदार्थ करण्याऐवजी आज एक नवीन पदार्थ जाणून घ्या जो खूप हेल्दी असेल कारण ही रेसिपी फळांची असणार आहे. तर आज आपण जाणून घेणार आहोत उपवासाचा रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि त्याची कृती.
उपवासाचा रायता बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
१) दही २ कप
२) मलाई १०० ग्रॅम
३) द्राक्षे
४) सफरचंद
५) केळी
६) साखर- आवश्यकतेनुसार
७) काकडी
८) खरबूज
९) १ डाळिंब
१०) वेलची पावडर
११) सैंधव मीठ- आवश्यकतेनुसार
उपवासाचा रायता बनवण्याची कृती :
१) सर्वप्रथम सगळी फळे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. केळ्याची साल सोलून घेऊन सफरचंद, द्राक्षे, खरबूज, काकडी यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत.
२) आता एक मोठं भांड घेऊन त्यात दोन चमचे दही आणि मलाई घालून साखर टाका आणि ते मिश्रण नीट मिक्स करून घ्या.
३) आता सर्व बारीक चिरून घेतलेली फळे त्या मिश्रणात मिक्स करा.
४) सर्व मिश्रण नीट एकत्र करून घेऊन त्यात वेलची पूड घाला आणि ढळवून घेऊन थोडा वेळ थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवून द्या.
५) तुम्हाला पाहिजे असेल तर त्यात आवश्यकतेनुसार मीठ घाला.
अश्याप्रकारे हा उपवासाचा फळांचा रायता उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी तयार होईल. हा रायता तुम्ही नवरात्रीच्या उपवासालाच नाही तर इतर उपवासाच्या दिवशी पण खाऊ शकाल.
हे ही वाचा:
Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर