यंदा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. निकालही त्याच दिवशी जाहीर होणार आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने ११ नावांची यादी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. आगामी विधानसभा निवडणुका आणि राजकीय समीकरणे डोळ्यासमोर ठेवून भाजप पक्षाच्या दिग्गजांनी यापैकी ५ नावांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थाने महत्त्वाची मानली जात आहे.
भाजपने विधान परिषदेसाठी (Vidhan Parishad Election) पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. यात भाजपाने पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) तीन ओबीसी नेत्यांना संधी दिली आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेत संधी मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. आज म्हणजे २ जुलै २०२४ रोजी पंकजा मुंडे आपला उमेदवारीचा अर्ज भरणार आहेत. त्याआधी पंकजा मुंडेंनी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्या वरळीत दाखल झाल्या. माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे दिसून आल्या.
भारतीय जनता पक्षात पंकजा मुंडे दीर्घकाळापासून राजकीय सत्तेच्या वर्तुळाबाहेर होत्या. गेल्या पाच वर्षांपासून त्या सक्रीय राजकारणातून बाहेर होत्या. २०१९ मध्ये विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. या यात्रेच्या माध्यमातून पक्षात आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. परंतु त्यानंतर त्यांना पक्षाकडून लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली नव्हती. आता त्यांना नुकतीच लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली त्यामुळे त्या प्रसार माध्यमांशी बोलताना भावुक झाल्या. त्या म्हणाल्या की – “मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे. जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते,” असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसून आले.
एक प्रकारे त्यांनां विधान परिषदेची संधी दिली हा त्यांच्या दृष्टीने एक महत्वाचा असा बुस्टर ढोस आहे असं आमदार सुरेश धस म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले – “पंकजा मुंडेंचे पुनर्वसन होणं पार्टीच्या दृष्टीने गरजेचं होतं. सर्व जनतेची आणि कार्यकर्त्यांची मागणी मान्य करण्यात आली आहे. विरोधक टीका काय करतील याचा नेम नाही. ते काय म्हणतात त्यापेक्षा सर्व मान्य नेतृत्व त्या आहेत. सगळ्यांना अपेक्षा होती त्यांच्या पुनर्वसनची आणि पार्टीने ते केलं आहे. यावेळी मात्र मागील 5 वर्ष संधी दिली नाही हे देखील दुःख कार्यकर्त्यांमध्ये होतं. पण आता पार्टीने निर्णय घेतला आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो. अधिक जोमाने आम्ही येणाऱ्या निवडणूकीत सामोरं जाऊ.” याच सोबत त्यांनी पंकजा मुंडे मंत्रिपदाची संधी मिळावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे त्यानी सांगितले.
विधान परिषदेसाठी भाजप (BJP) कडून या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली आहे. ते उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
- पंकजा मुंडे (Pankaja Munde)
- योगेश टिळेकर (Yogesh Tilekar)
- परिणय फुके (Parinay Fuke)
- अमित गोरखे (Amit Gorkhe)
- सदाभाऊ खोत (Sadabhau Khot)
महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या ११ जागा २७ जुलै रोजी रिक्त होत आहेत. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार असून सध्याचं संख्याबळ पाहता भाजपच्या ५, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनचे २, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि महाविकास आघाडीचे २ उमेदवार विजयी होऊ शकतात.अशी शक्यता वर्तवली जात आहे. आता या रिक्त जागांसाठी कोणाची वर्णी लागते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हे ही वाचा:
जितेंद्र आव्हाड यांनी केला मोठा आरोप, वर्ल्ड कपच्या नावाखाली…
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.