राज्य सरकारने यंदाच्या वर्षी सर्व सण निर्बंध मुक्त साजरे करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडी संदर्भात मोठी घोषण केली आहे. आता दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यात येणार आहे. राज्य सरकारने नोकऱ्यांमध्ये खेळाडूंना दिलेल्या पाच टक्के आरक्षणाचा लाभ आता गोविंदांनाही मिळणार आहे. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मृत्यू झाल्यास 10 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर गंभीर जखमी झालेल्यांना 7.50 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. तर हात-पाय जायबंदी झालेल्यांना 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन सादर केलं. ते म्हणाले, दहिहंडीवेळी जर एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाला तर त्याला शासनाकडून 10 लाख रुपये मदत देण्यात येईल. तसेच जर एखादा गोविंदा जबर जखमी झाला तर त्याला साडेसात लाख रुपये, अपघातात अपंगत्व आलं तर पाच लाख रुपये मदत देण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.
दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
हेही वाचा :
रायगडमध्ये सापडलेल्या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नाही – देवेंद्र फडणवीस