महाराष्ट्रातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाऊस गेल्या महिन्यात पडला असल्याने याचा परिणाम शेती पिकांवर झाला आहे. कांद्याचे नवीन आलेले पीक पावसात खराब झाल्याने राज्यातील कांदा उत्पादन घटले असल्याचे दिसून येत आहे. याचा थेट परिणाम आवकीवर झाला असून नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांदा आवक कमी होऊ लागली आहे. दिवसाला सव्वाशे गाड्यांची आवक आता शंभरीच्या आत आली आहे. आलेला कांदाही भिजलेला असल्याने खराब झाला आहे. यामुळे कांद्याच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे.
हेही वाचा :
गेल्या महिन्यात १५ रुपयांपर्यंत मिळणारा कांदा आता घाऊक मार्केटमध्ये ३० ते ३२ रुपये किलोवर गेला आहे. तर घाऊक मार्केटमध्ये कांद्याच्या किंमती वाढू लागल्याने किरकोळ मार्केटमध्ये ४० रुपयांवर कांदा पोहोचला आहे. येत्या दोन महिन्यात कांद्याचे नवीन पीक येण्याची शक्यता नसल्याने जानेवारीपर्यंत कांद्याचे दर चढेच राहणार असल्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
तर काही ठिकाणी दिवाळीमुळे लासलगाव, मनमाडसह जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव बंद होते. सोमवारपासून बाजार समित्यांचे कामकाज सुरू झाले. पहिल्या दिवशी लासलगाव बाजारात ११ हजार ८४६ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास किमान ८५१, कमाल ३१०१, सरासरी २४५० रुपये दर मिळाले. या बाजारात २१ ऑक्टोबर रोजी कांद्याला सरासरी १८६० रुपये दर मिळाले होते. पावसामुळे नव्या कांद्याचे आगमन लांबणीवर पडणार आहे. चाळीतील बराचसा कांदा निकृष्ठ झाल्यामुळे फारसा माल शिल्लक नाही. दिवाळीनंतर मागणी वाढली असताना तुलनेत माल कमी आहे. या स्थितीचा कांदा दरावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते.
कांदा अधिक महागण्याची चिन्ह
सप्टेंबरमध्ये लागवड केलेले कांद्याचे पीक पावसामुळे वाया गेल्याने आता डिसेंबरमध्ये नव्या कांद्याची आवक होणार आहे. त्यामुळे सुमारे दोन महिने वाढणारी मागणी पाहता कांदा आणखी महागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून दर वाढण्याची शक्यता असून, आता सामान्यांनाही कांदा पुन्हा रडवणार असल्याचे चित्र आहे.
Share Market : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची चांदी; सेन्सेक्स ६१, १२१ हजारांवर