भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान नागपुरात होणाऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यासाठी ५०० हुन अधिक अधिकारी आणि दोन हजार कर्मचारी असा अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार करण्यात आला आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील मैदानावर उद्या शुक्रवारी (23 सप्टेंबर) हा सामना होणार आहे. नागपूर शहरापासून जामठापर्यंतच्या मार्गावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावली जाणार असल्याची माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. दीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय सामना होणार असल्याने नागपूरकर क्रिकेटप्रेमींसाठी एकप्रकारे मेजवानी राहणार आहे. पण पोलीस आयुक्तांनी यासंदर्भात महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :
PFIच्या कार्यालयावर NIAची छापेमारी सुरूच : तब्बल 20 संशयित ताब्यात
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, “नागपूर-वर्धा महामार्गावर असलेल्या जामठा स्टेडियमवर मॅचच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते, हा आजवरचा अनुभव आहे. हीच बाब लक्षात घेऊन पोलिसांनी यंदा वेगळे नियोजन केले आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मॅच पाहायला येणाऱ्या प्रेक्षकांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेचा वापर करावा. यंदा कार पार्किंग स्टेडियमपासून दीड किलोमीटर अंतरावर असल्याने प्रेक्षकांनी शक्यतो कार ने येणे टाळावे, कारने मॅच पाहण्यासाठी यायचे असल्यास ड्रायव्हरचा वापर करावा.” अशा सूचनाही नागपूर पोलिसांनी केल्या आहेत.
Touchdown Nagpur 📍🧡#TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/Odt7nFjlTe
— BCCI (@BCCI) September 21, 2022
दहशतवाद विरोधी पथकाची अनेक राज्यात कारवाई सुरु, पुण्यात दोन संशयीतांना अटक
मॅच संपल्यानंतर जामठा स्टेडियमपासून नागपूर शहराच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर ग्रीन कॉरिडोर निर्माण केला जाणार आहे. त्यामुळे रात्री साडेनऊ ते मध्यरात्री बारा दरम्यान या मार्गावर कोणालाही वाहनांची पार्किंग करता येणार नाही. त्याचबरोबर, नागपूर मेट्रोची सेवा खापरीपर्यंत उपलब्ध असून मॅचच्या दिवशी मेट्रोकडून अतिरिक्त फेऱ्या सुरु राहतील. तर खापरी मेट्रो स्टेशनपासून जामठा स्टेडियमपर्यंत विशेष बस सेवाही उपलब्ध राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
सामन्या दरम्यान वादळी पाऊस…
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सामन्याच्या दिवशी सकाळी वादळी पावसाची शक्यता आहे. सामना सायंकाळी ७ वाजेपासून असल्याने त्यावेळी पाऊस हजेरी लावेल का, हे हमखास सांगता येणार नाही. आकाश मात्र दिवसभर आणि सायंकाळी ढगाळ असेल. दरम्यान मंगळवारी रात्रभर पावसाने दमदार हजेरी लावताच बुधवारी जामठा मैदानाशेजारच्या पार्किंगच्या जागेवर चिखल झाला होता. सभोवताल शेताची जमीन असल्याने चारचाकी आणि दुचाकी वाहने चिखलात फसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.