जालन्यामध्ये पोलिसांनी अमानुषपणे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यावेळी झालेल्या दगडफेकीमुळे पोलसदेखील जखमी झालेले आहेत. काल शरद पवार, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, उदयनराजे भोसले, संभाजीराजे छत्रपती यांनी जालन्यात जात आंदोलकांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मराठा बांधवांना संदेश देत शांततेचं आवाहन केलं होतं. जालन्यातील घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात आंदोलनं पेटली आहेत. कुठे वाहनं पेटवली जाताहेत तर कुठे लोक रस्त्यावर उतरुन निषेध करीत आहेत. एकूणच राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटताना दिसून येत आहे.
जालन्यातील मराठा आंदोलनाचे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत भाजपचे जे १०६ आमदार निवडून आलेले आहेत त्यामध्ये हेसुद्धा लोक आहेत ज्यांनी भाजपला मतं दिलीत.. अन् त्यांच्यावर लाठीहल्ला झाला. सरकारने मराठा समाजाच्या प्रश्नांचा आतातरी गांभीर्याने विचार करावा, असं ते म्हणाले.लाठीहल्ला झाल्यामुळे अनेकजण भेटीला आले अन् त्यांनी जाहीरपणे पाठींबा दिला. यामध्ये माणुसकी दिसून आली. सरकारनेही माणुसकी दाखवायला पाहिजे होती. संवेदनशील मुख्यमंत्री आहेत ना? त्यांच्यापेक्षा संवेदनशील गृहमंत्री अन् महाराष्ट्राचे ते बलाढ्य नेते आहेत. किती आईंचे डोके फुटले विचारलं का? माझ्या पोलिसांना मारलं..माझ्या पोलिसांना मारलं असं म्हणून तुप लावणं सुरुय. रेंद्यात टाकू टाकू आईला मारलं, तिच्यावर ३०७चे गुन्हे दाखल केले. जे तुमचे १०६ निवडून आले ना, त्यात तुम्हाला मतदान करणारी ही आईपण होती. भेटीसाठी आलेल्यांना तुम्ही वाहात्या गंगेत हात धुणं म्हणता, मग तुम्ही भेटायला तरी आलात का? असा संतप्त सवाल मनोज जरांगे पाटलांनी उपस्थित केला.
जालना येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान जळगाव जामोद, नांदुरा, बुऱ्हानपूर मार्गावर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सकाळी पाच वाजल्पायासून रस्ता रोको आंदोलनाची सुरुवात केली आहे. गेल्या तीन तासापासून या महामार्गावर वाहतूक ठप्प झाली आहे. पोलिसांनी बळाचा वापर करत या कार्यकर्त्यांना आता ताब्यात घेतलं आहे.या ठिकाणी तणाव निर्माण झालेला आहे.
हे ही वाचा:
मराठा आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर , मराठवाड्यातील बस सेवा बंद
जालन्यातील प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी केले वक्तव्य म्हणाले…