राष्ट्रपती महोदयांचे प्राचीन आणि ऐतिहासिक शहर असलेल्या उदगीर शहरात आल्याबद्दल स्वागत करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्य शासनामार्फत सुरु असलेल्या महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाच्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच राष्ट्रपतींच्या जीवनातील संघर्ष हा सर्वसामान्य महिलांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी केलेल्या संघर्षामुळेच आज त्या देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाल्या आहेत. या ठिकाणी उपस्थित महिलांना राष्ट्रपती महोदयांच्या यशाचे कौतुक असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांनी महाराष्ट्राच्या दैदिप्यमान इतिहासाचे कौतुक करत महिला सक्षमीकरणाला राज्य शासन चालना देत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणि शासन आपल्या दारी योजना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन होते. तर विशेष अतिथी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्राम विकास आणि पंचायतराज, पर्यटन मंत्री तथा जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीश महाजन, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे आणि महिला व बाल कल्याण मंत्री श्रीमती आदिती तटकरे यांचीही उपस्थिती होती.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम राहणार असल्याचे स्पष्ट करत राज्य शासनाने केंद्र शासनाच्या लखपती दिदी योजनेसह मुख्यमंत्री लेक लाडकी योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यक्रम योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत योजना, अन्नपुर्णा योजना, शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना यासह महिलांच्या सशक्तीकरणावर भर असलेल्या योजनांमुळे शासन सकारात्मक दिशेने वाटचाल करत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही ती पुढेही चालूच राहणार आहे. माझी एकही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही आणि माता भगिनींचा आशीर्वाद कायम राहिल्यास दीड हजाराची रक्क्म वाढविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश आर्थिक महासत्ता बनण्याकडे अग्रेसर असून, अकराव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आम्ही झेप घेतली आहे. महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत कायम आघाडीचे राज्य राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. संविधान बदलाच्या अफवेला त्यांनी फेटाळून लावले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे सामान्य कुटुंबातील एक संघर्षशील महिला आपल्यापुढे राष्ट्रपती म्हणून विराजमान आहेत. तर मागास वर्गीयाचे प्रतिनिधीत्व नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री आहेत. त्यामुळे या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. स्थानिक आमदार व मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर जिल्हा करण्याची तसेच उदगीर येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याची मागणी आपल्या प्रास्ताविकात केली होती. त्याचा उल्लेख करताना त्यांनी सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील, असे सांगितले.
हे ही वाचा:
कोण होणार Mahavikas Aghadi चा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? Sharad Pawar यांचे मोठे वक्तव्य