आज १२ डिसेंबर अर्थात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा ८३ वा वाढदिवस. महाराष्ट्रातील दुष्काळाची समस्या लक्षात घेऊन शरद पवार त्यांचा वाढदिवस साजरा करणार नसले तरीही कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वाढदिवसाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच, संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. अशातच, वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून शरद पवार यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ‘लढेंगे-जितेंगे’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे सुप्रिया सुळे यांची पोस्ट?
आधी लढाई जनहिताची !!!
प्रिय बाबा, आज तुमचा वाढदिवस. खरं तर तो केवळ आमच्यासाठी वाढदिवस, तुम्हाला सर्व दिवस सारखेच. लोक तुमचे सांगाती आणि तुम्ही लोकांचे सांगाती. मायबाप जनतेच्या शुभेच्छा, आशिर्वाद आणि डॉक्टरांची अनमोल साथ यांच्या बळावर साहेब आज आपण वयाची त्र्याऐंशी वर्षे पूर्ण करत आहात. ही मोठी आनंदाची बाब आहे. आम्ही सर्वजण त्यांच्याप्रती अंतःकरण पूर्वक कृतज्ञ आहोत.
कालही तुम्ही कांद्याच्या प्रश्नावर भूमिपुत्रांसोबत नाशिकच्या रस्त्यावर होतात. तोच आणि तशाच जनहिताच्या प्रश्नांची तड लावण्याचा प्रयत्न मी इथे संसदेत सगळी ताकद पणाला लावून करते आहे. मला अनेकांनी विचारले आज संघर्ष यात्रेसाठी नागपुरात येणार का? पण आपण कायम केलेल्या मार्गदर्शनानुसार आपल्या बारामती लोकसभा मतदार संघातील आणि राज्यातील जनतेचे मुद्दे घेऊन मी सभागृहात लढते आहे.
आजी शारदाबाई (बाई) आणि आजोबा गोविंदराव आबा यांनी जे जनसेवेचे व्रत आपणावर सोपवले आहे त्याच्याशी आयुष्यभर आपण कटिबद्ध आहोत. जनहिताची पूर्ती होणं हाच तुमचा ध्यास आणि आनंद आहे. तुम्हाला त्यासाठी आम्ही सर्व साथ-सोबत असणं म्हणजेच तुमचा वाढदिवस साजरा करणं होय.
संघर्षाच्या या काळात आपण सर्व प्रकारच्या अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल याचा आम्हा सर्वांनाच सार्थ विश्वास आहे. लढेंगे-जितेंगे !! बाबा , तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
शरद पवार यांची थोडक्यात कारकीर्द
शरद पवार यांच जन्म १२ डिसेंबर १९४० रोजी महाराष्ट्र राज्यातील बारामती शहरात झाला. पवारांनी १९६० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश घेत आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. ते १९६७ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि १९७८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या मुख्यमंत्रीपद त्यांनी तीन वेळा भूषवले. १९८४ मध्ये, ते लोकसभेवर (भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह) निवडून आले आणि १९९१ पर्यंत त्यांनी संसद सदस्य म्हणून काम केले. १९९९ मध्ये, पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून हा पक्ष महाराष्ट्र आणि भारताच्या इतर भागांमध्ये एक प्रमुख राजकीय शक्ती बनला आहे. शरद पवार यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) चे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, अंडरवर्ल्ड संबंध याशिवाय अनेक वाद, घोटाळ्यांशी पवारांचे नाव जोडले गेले होते. असे असले तरीही राजकारणातील कुशाग्र बुद्धीच्या जोरावर विविध पक्षांसह युती करुन ती टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवरुन त्यांचे कौतुकही झाले आहे. शरद पवार कृषी आणि ग्रामीण भागातील विकास कामांमधील त्यांच्या कौशल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. भारतातील शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी एक वकील म्हणून त्यांनी काम केले होते. त्यांनी देशाची आर्थिक धोरणे तयार करताना प्रामुख्याने व्यापार, उद्योग क्षेत्रात बहूमूल्य योगदान दिले. पाच दशकांपेक्षा जास्त काळ देशाच्या राजकारणामध्ये सक्रिय असणारे शरद पवार हे भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत.
हे ही वाचा:
STATE BACKWARD COMMISSION च्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
MAHARASHTRA: राजू शेट्टींचे काटा बंद आंदोलन मागे