गेल्या नऊ दिवसांपासून सुरु असलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचे आमरण उपोषण आज (बुधवार, २५ सप्टेंबर) स्थगित करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण आज नवव्या त्यांनी थांबवले आहे. मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांनी उपोषण स्थगित करावं अशी मागणी अंतरवाली सराटीमध्ये जमलेल्या मराठा बांधवांनी केली होती. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला. आता मनोज जरांगे पाटील यांच्यावर छत्रपति संभाजीनगरमधील रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीवरून तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे आंदोलनाला बसले होते. पण या काळात त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सरकारने कोणताही पाऊल उचललं नसल्याचे दिसून आले. यात त्यांची तब्येत अत्यंत खालावल्याचे दिसून आले. यातच त्यांनी दॊक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार दर्शवला होता. त्यामुळे त्यांनी उपचार घ्यावेत, असा आग्रह अंतरवालीत जमलेल्या मराठा समाजबांधवांनी केला होता. यामुले त्यांना दोनवेळा सलाईनदेखील लावण्यात आली होती.
संभाजीराजे छत्रपति यांनी सोमवारी (२३ सप्टेंबर) अंतरवालीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत जरांगेच्या उपोषणावर लक्ष देण्याचं आवाहन केले होते. तसे इथे काही झाल्यास त्याची जबाबदारी सरकार आणि विरोधक या दोघांचीही असेल असा इशारादेखील दिला होता. तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरंगे यांच्याविरोधात वडीगोद्री येथे आंदोलन सुरु केले होते.
धुळ्यात मराठा समाज रस्त्यावर, मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सकल मराठा समाजाच्यावतीने आज मुंबई-आग्रा महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात आले. महामार्गावर वाहतूक ठप्प झाल्याने पोलिसांनी वेळीच दखल घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. दरम्यान, आंदोलकांनी यावेळी आरक्षणयोध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या मागण्या त्वरीत मान्य करण्यात याव्यात अन्यथा राज्यभरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो, असा इशाराही दिला. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. याचा निषेध म्हणून आज मुंबई-आग्रा महामार्गावर सकल मराठा समाजाच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिणामी, पोलिसांनी दखल घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणला होता.
हे ही वाचा:
Akshay Shinde Encounter : एन्काऊंटर होऊच शकत नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धरले धारेवर