मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडाला जून महिन्यात दोन वर्षे होती. सुरत गुवाहाटीचा प्रवास आणि त्यानंतर झालेल्या सत्तांतराच्या आठवणींना एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उजाळा दिला. विधानसभेत मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लक्षवेधी सुचनेवर उत्तर देताना २९ जूनला विधानसभेत जोरदार बँटींग केली. शुक्रवार दिनांक २८ जून रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री स्वतःच खूष होते. त्यामुळे तीर्थ दर्शन योजनेवर बोलण्याऐवजी अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदींवर बोलताना विरोधी सदस्यांना नामोहरम करण्यास सुरवात केली. सत्ताधारी बाकांवरून आनंदाचे चित्कार तर विरोधी बाकांवरून आरोप होत होते. गॅस सिलिंडरच्या योजनेवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, गॅसचे भाव वाढले गॅसचे भाव वाढले कसे होणार अशी चिंता होती. पण अजितदादांनी ती चिंता दूर केली. तीन सिलिंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला. मोफत सिलिंडर दिल्यामुळे विरोधक ‘गॅस’वर आले आहेत असे सांगताना स्वतः मुख्यमंत्र्यांना हसू आवरता येत नव्हते. शेतकऱ्यांना काय दिले म्हणून टिका होत होती. पण अतिवृष्टी अवकाळी व गारपिटीच्या नुकसान भरपाईसाठी १५ हजार कोटी रुपये आतापर्यंत दिले. ते कधीच दिले नव्हते. पण विरोधकांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली, शेतक-यांना फसवले अशी टिका करतात, पण एनडीआरएफच्या निकषाच्या दुप्पट आम्ही दिले असे मुख्यमंत्री म्हणाले, त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. त्यावर ‘हा एकनाथ शिंदे आयुष्यात कधी खोटं बोलला नाही. खोट बोलणार नाही, जे बोललो ते करणार’. त्यावर विरोधकांनी गदारोळ सुरु केला तेव्हा खरं ऐकण्याची सवय ठेवा असे सांगत मुख्यमंत्री विजय वडेट्टीवार यांना उद्देशून म्हणाले, विजयभाऊ तुम्ही माझे मित्र आहात.
उबाठा गटाच्या रिकाम्या बाकांकडे बोट दाखवत मुख्यमंत्री म्हणाले की, ते बाकी लोकांसारखी तुम्हाला पण सवय लागलीय खोटं बोला पण रेटून बोला, यावर विजय वडेट्टीवार मिश्किलपणे हसले त्यावर’ ‘तुम्हाला मी चांगले समजत होते. आपले मित्र आहात तुम्ही, मात्र वाण नाही पण गुण लागला तुम्हाला’ अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विजय वडेट्टीवार यांच्याकडे बघत केली. लोकसभा मे चादर फट गई अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी केली होती. या टिकेचाही मुख्यमंत्र्यांनी यानिमित्ताने समाचार घेतला. अरे मोदी साहेब तर प्रधानमंत्री झाले. आणि हरलेले लोकं येड्यासारखे पेढे वाटायला लागले. कशाला पेढे वाटता, विरोधी पक्ष नेते पद मिळाले म्हणून पेढे वाटता, आम्हाला हरवण्यासाठी जंगजंग पछाडले तुम्ही पण मोदींना हरवू शकले नाहीत. कालच्या अर्थसंकल्पानंतर तुमचे चेहरे पांढरेफट्टक पडले होते. फेक नॅरेटिव्ह पसरवून लोकसभेत थोड्या जादा जागा मिळाल्या, मत मिळाल्यावर येवढे फुगले होते की, विधानसभा जिंकलीच म्हणून समजता, पण अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सर्वांचे सुतक झाले होते. सुपडा साफ झाला.. महायुती सरकारने केलेल्या कामांची यादी सांगण्यास मुख्यमंत्र्यांनी सुरवात केली. तेव्हा विरोधी सदस्यांनी गोंधळ सुरु केला. सत्ताधारी बाकांवरूनही घोषणा सुरु झाला. या गोंधळाला आवर घालण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उभे राहिले आणि शांत राहाण्याचे आवाहन करीत होते. पण तरीही सत्ताधारी व विरोधी बाकांवरील सदस्यांच्या गोंधळ सुरुच होता. तेव्हा अध्यक्षांनी तुम्ही सभागृहात चुकीचा पायंडा पाडत आहात, अशा शब्दात नाराजी व्यक्त केली.
मुख्यमंत्री शिंदे हे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेवर बोलण्याऐवजी अर्थसंकल्पातील घोषणांवर बोलत राहिल्याने अखेर विजय वडेट्टीवार यांनी विषयावर बोला अशी मुख्यमंत्र्यांना आठवण करून दिली. पण तरीही मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी सुरुच होती. आम्ही योजना केल्यामुळे तुमचे फेक नॅरेटिव्ह चालणार नाही. जनतेने आता ओळखले आहे. तुम्ही येवढे सर्व करूनही पंतप्रधान पदापासून मोदींनी तुम्ही रोखू शकले नाहीत. खोट बोलून तुम्ही ज्यांची मत घेतली ते आमच्याकडे आले आहेत. चुकी झाली आमची असे ते सांगत आहेत. मी आयुष्यात कधीही खोट बोलत नाही. मी जे करतो ते लपून छपून करत नाही. मी केलेलं काम सर्वांना माहिती आहे. दोन वर्षापूर्वी जे काही केले केले ते ‘ओपनली’ केले. ते सर्वांना माहिती आहे. तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली असे मुख्यमंत्र्यांनी सांगताच सत्ताधारी बाकांवरून टाळ्यांच्या एकच कडकडाट झाला. अधिवेशाच्या दुस-या दिवशी बजेट सादर झाले. पण शनिवारीही या बजेटचे पडसाद सभागृहात उमटत राहिले.