Mumbai Nagpur Samruddhi Mahamarg Route : ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg)उभारण्यात येत आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकापर्ण होणार आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा ५७० किलोमीटरचा आहे.
नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी नागपूर येथून करण्यात येत आहे. राज्याच्या या योगदानात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या शहरांचा हातभार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील काही भाग विकासापासून मागे पडले आहेत. मागासलेल्या भागांच्या विकासासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग विकासाचा महामार्ग ठरणार आहे. ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक ८३११ हेक्टर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया अवघ्या आठ महिन्यात पार पडली. समृध्दी महामार्गाचा डिझाइन स्पीड १५० कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून १०० कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर नागपूरहून मुंबईपर्यंत यायला अवघे ६ ते ८ तास लागतील. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे.
राज्यातला सर्वात मोठा चौक –
समृद्धी महामार्गाच्या सुरुवातीलाच तब्बल १८ एकर विस्तार असलेला आणि सुमारे एक किलोमीटरची परिक्रमा असलेला राज्यातला सर्वात मोठा चौक उभारण्यात आला आहे. जेवढा अवाढव्य समृद्धी महामार्ग आहे, तेवढाच प्रशस्त समृद्धीच्या आरंभबिंदूवरचा हा चौक आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांसाठी १२० किलोमीटर प्रतितासची वेग मर्यादा आहे.. म्हणजेच अत्यंत तीव्र गतीने समृद्धी महामार्गावर वाहनांचा आवागमन होणार आहे. मात्र समृद्धी महामार्गावरून बाहेर पडताना वाहनांचा वेग हळुवार पद्धतीने कमी होत जावा या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनच समृद्धीच्या झिरो माइल्सवर तब्बल एक किलोमीटरची परिक्रमा असलेला चौक उभारण्यात आला आहे.. समृद्धी महामार्गावरून प्रवास केल्यानंतर नागपूरच्या दिशेने जाणारे वाहन याच चौकाची परिक्रमा करताना हळूहळू वेग कमी करतील आणि मग सुरक्षित दृष्ट्या पुढचा प्रवास करतील असा उद्दिष्ट यामागे आहे… समृद्धीच्या आरंभबिंदू वरचा हा चौक खूप सुंदर ही आहे… तिथे आकर्षक रंगांची फुलझाडं आणि अनेक प्रजातीची मोठी झाडंही लावण्यात आली आहेत. त्याचा आकार अंगणात रांगोळी घालावी असा असून आकाशातून हा चौक समृद्धी महामार्गावरची प्रचंड आकाराची रांगोळी सारखाच दिसतो. समृद्धी महामार्गावरच्या या विशाल चौकात विद्युत रोषणाई करण्यासाठी खास सोलार ट्री लावण्यात आले आहेत. त्यामुळे तिथेच निर्माण होणाऱ्या विजेतून रात्रीच्या वेळेला या चौकाचे सौंदर्य आणखी खुलणार आहे.
२४ जिल्ह्यांना लाभ –
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ३९२ गावांना जोडणार आहे. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून १४ जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील ३६ पैकी २४ जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
समृद्धी महामार्ग आणि त्यासाठी २४ ठिकाणी बांधण्यात येणार असलेले जोडरस्ते यांमुळे राज्यातील अनेक पर्यटन स्थळे परस्परांना जोडली जाणार आहेत. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लोणारचे सरोवर, वेरुळ-अजिंठा लेणी, पेंच राष्ट्रीय उद्यान, शेगाव, सेवाग्राम, शिर्डी, दौलताबादचा किल्ला, बिबी का मकबरा इत्यादी पर्यटन स्थळे नजीक येणार आहेत.
समृद्धी महामार्गाची वैशिष्टये –
लांबी ७०१ किमी , एकूण जमीन : ८३११ हेक्टर , रुंदी : १२० मीटर , इंटरवेज : २४ , अंडरपासेस : ७०० , उड्डाणपूल : ६५ , लहान पूल : २९४ , वे साईड अमॅनेटीझ : ३२ , रेल्वे ओव्हरब्रीज : ८ , द्रुतगती मार्गावरील वाहनांची वेगमर्यादा ताशी : १५० किमी (डिझाइन स्पीड) , द्रुतगती मार्गाच्या दुतर्फा झाडांची संख्या : साडे बारा लक्ष , कृषी समृद्धी केंद्रे : १८ एकूण गावांची संख्या : ३९२ , प्रकल्पाचा अंदाजित खर्च: ५५ हजार कोटी रुपये , एकूण लाभार्थी : २३ हजार ५०० , वितरित झालेला मोबदला : ६ हजार ६०० कोटी रुपये , कौशल्य विकास प्रशिक्षणाचे लाभार्थी : ३५६ , द्रुतगती मार्गालगत सीएनजी/ पीएनजी गॅस वाहिनी : गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया मार्फत , ऑप्टिकल फायबर नेटवर्कचे जाळे
हे ही वाचा :
Sulochana Chavan रसिक प्रेक्षकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा गायन प्रवास