२९ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने (India Meteorological Department ) वर्तवली आहे. परंतु काल रात्री पासूनच मुंबईतील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अंधेरी, कुर्ला, दादर, वांद्रे, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, लालबाग, परळ, भायखळा, विलेपार्ले या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच नवी मुंबईसह, ठाणे परिसरात देखील पावसानं दमदार हजेरी लावली आहे.
मुंबई तसेच मुंबई लगतच्या परिसरात पावसानं अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळं उष्णतेपासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु त्याचसोबत अनेक भागात पाणी देखील साचले आहे. अशातच जर पाऊस असाच पडत राहिला तर मुंबईत मान्सून दाखल होण्याचे निकष आजच पूर्ण होतील आणि हवामान विभागाकडून मान्सून सक्रिय झाल्याची घोषणा सुद्धा करण्यात येईल अशी शक्यता आहे.काल रात्रीपासून मुंबईसह राज्यभरात देखील पाऊस कोसळत आहे. पालघर जिल्ह्यात सुद्धा मध्यरात्रीपासून पावसाची हजेरी लागली आहे. पालघर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस सुरु आहे. दरम्यान, २६ जून रोजी मान्सून मुंबई दाखल झाल्यास आत्तापर्यंतचा सर्वात उशिरा दाखल होण्याची नोंद होणार आहे. याआधी २०१९ साली २५ जून रोजी मान्सून दाखल झाला होता. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात संपूर्ण राज्यात पावसाचं चित्र स्पष्ट होणार आहे.बऱ्याच विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे.
मुंबईसह पूर्व विदर्भात सुद्धा मान्सूनचे आगमन झाले असून आज मान्सून विदर्भ व्यापण्याची शक्यता आहे. २५ जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मात्र पश्चिम विदर्भात आणखी एक ते दोन दिवस मान्सूनची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मॅान्सूनने पूर्णपने व्यापला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं मान्सूनची वाटचाल जोरात सुरु आहे. राज्यात विदर्भासह कोकण आणि मुंबई परिसरात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकऱ्यांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे.
हे ही वाचा:
आता ईडीमुळे सांगलीत देखील खळबळ, पाच व्यापारी ईडीच्या रडारवर
Sundar Pichai यांनी PM Modi यांच्या डिजिटल इंडियाचे केले कौतुक