महाराष्ट्र विधिमंडळाचा (Maharashtra Monsoon Session 2024) आज (शनिवार २९ जून) तिसरा दिवस पार पडला. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज महाराष्ट्र विधानसभेत (Maharashtra Vidhasabha) पवईतील जय भीम नगर (Powai Jay Bhim Nagar) मधील घरांवर झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारवाईवर प्रश उपस्थित केले. जयभीम नगर मधील सुमारे ६५० घरांवर अनधिकृत झालेल्या कारवाईनंतर बेघर कुटुंबाच्या निवार्याची व्यवस्था करा, अशी मागणी त्यांनी केली.
पवई भागातील जय भीम नगरमधील झोपड्या तोडल्याचा प्रश्न उपस्थित करुन नाना पटोले म्हणाले की, “जयभीम नगरमधील ६५० गरिब, मागासवर्गिय कुटुंबांवर ६ जूनच्या रात्री पोलीस बंदोबस्तात कारवाई करून या कुटुंबांना बेघर करण्यात आले आहे, आज ही सर्व कुटुंबं रस्त्यावर आहेत. पोलीस व मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून चुकीची कारवाई करून या मागासवर्गीय लोकांना बेघर करण्यात आले.”
ते पुढे म्हणाले, “२०११ पर्यतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण आहे आणि पावसाळ्यात झोपडपट्ट्यांवर कारवाई करु नये असे मा. न्यायालयाचे आदेश असतानाही पोलीस बंदोबस्तात ह्या झोपड्या का तोडल्या? पोलीसांनी लहान मुले, महिलांना मारहाण केली, याला जबाबदार कोण? हे सरकार बिल्डर हिरानंदानीला पाठीशी घालत आहे का? सरकारने त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करायची ती करावी पण ज्या ६५० कुटुंबांना रस्त्यावर आणले त्यांच्या राहण्याची व्यवस्था कुठे करणार हे सरकारने सांगावे.”
विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यावर म्हणाले की, “१ जूनपासून सप्टेंबरपर्यंत झोपडपट्यांवर अशी कारवाई करता येत नाही असे आदरणीय उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. या आदशाचे उल्लंघन झाले असेल तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. मुंबई महानगर पालिकेने बेघरांशी शेल्टर बांधले आहेत, संबंधित वार्ड अधिकाऱ्यांनी या लोकांची तेथे राहण्याची सोय करावी,” असे सांगितले.