मुंबईतील चिंचपोकळीत चप्पल आणि बुटांचा रास, नेमक्या कुठून आल्या इतक्या चपला?

चिंचपोकळी (Chinchpokali) येथे हजारो चपला (Shoes) आणि बुट (boots) सापडल्या आहेत. रस्त्यावर जागोजागी चपला आणि बुटांचा खच पडल्याचं दिसत आहे.

मुंबईतील चिंचपोकळीत चप्पल आणि बुटांचा रास, नेमक्या कुठून आल्या इतक्या चपला?

चिंचपोकळी (Chinchpokali) येथे हजारो चपला (Shoes) आणि बुट (boots) सापडल्या आहेत. रस्त्यावर जागोजागी चपला आणि बुटांचा खच पडल्याचं दिसत आहे. सकाळी सकाळीच चपला आणि बुटांचा खच पाहून मुंबईकरांमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. काल असं काय घडलं की रस्त्यावर चप्पल आणि बुटांचा खच दिसून येतोय अशी चर्चा सुरू आहे. मात्र, घाबरून जावू नका. चिंचपोकळीत विचित्र आणि भीतीदायक असं काहीच घडलेलं नाही. रस्त्यावर चप्पल आणि बूट सापडण्यामागचं कारण अगदी वेगळं आहे. तुम्ही ऐकल्यावर तुम्हालाही त्याचं नवल वाटणार नाही.

सध्या सण उत्सवाचे दिवस आहेत. राज्यातला सर्वात मोठा सण असलेला गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यामुळे बाजारात खरेदी सुरू आहे. अनेक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असून लोक खरेदीसाठी दुकानांमध्ये प्रचंड गर्दी करत आहेत. गिरगाव, दादर, घाटकोपर, चिंचपोकळी, करिरोड आणि घाटकोपर, मुलुंडसह अंधेरी, वांद्रे आणि विलेपार्ले परिसरातही हेच चित्र दिसत आहे. त्यामुळे मुंबईत सध्या गर्दीचा माहौल दिसत आहे. मात्र, चिंचपोकळीत सापडलेल्या चप्पल आणि बुटांचा या गर्दीशी काहीच संबंध नाही. त्यामुळे तुम्ही म्हणाल मग या हजारो चपला आणि बुट आल्या तरी कुठून? तुमचा प्रश्न रास्त आहे. आणि त्याचं उत्तरही सोप्पं आहे. ते कारण म्हणजे चिंचपोकळीच्या चिंतामणीचा (Chinchapokali Chintamani) आगमन सोहळा. चिंतामणीचा आगमन सोहळा काल थाटात पार पडला. काल संध्याकाळी हा आगमन सोहळा सुरू झाला. तो रात्री उशिरापर्यंत सुरू होता. यावेळी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक चिंचपोकळीत दाखल झाले होते. एवढेच नव्हे तर ठाणे, डोंबिवली, बदलापूर, टिटवाळा, आसनगाव, वांगणी आणि कर्जत ते कसाऱ्याहूनही अनेक भाविक आपल्या लाडक्या विघ्नहर्त्याचं स्वागत करण्यासाठी चिंचपोकळीत दाखल झाले होते. कुटुंबकबिल्यासह लोक या ठिकाणी आले होते. युवक युवतींचा आगमन सोहळ्याला नेहमीच चांगला प्रतिसाद असतो. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी झाली होती.

चिंतामणीच्या आगमनासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी झाली होती. गर्दीने संपूर्ण रस्ते फुलून गेले होते. त्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली होती. ढोलाच्या तालावर अनेकजण गुलाल उधळत ठेका धरत होते. यावेळी पोलिसांचा प्रचंड आणि कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दी इतकी होती की पाय ठेवायलाही जागा नव्हती. लोक कधी संथ तर कधी भरभर चालत होते. एकमेकांना खेटून चालत होते. या गर्दीतून चालताना अनेकांच्या चपला तुटल्या. पायातून बुट निसटले. त्यामुळे गर्दीतच बूट आणि चपला सोडून भाविकांना अनवाणी चालावे लागले. गर्दीतून चालताना काही लोकांच्या चपला पायातून निसटल्या आणि हरवल्या. गर्दी इतकी होती की वाकून चपला पाहणंही शक्य नव्हतं. नाही तर गर्दीत तुडवले जाण्याची भीती होती. त्यामुळे लोक चपला शोधण्याचं सोडून बाप्पाच्या मिरवणुकी मागोमाग चालत होते. सकाळी जेव्हा गर्दी ओसरली आणि रस्ते सुनसान झाले तेव्हा रस्त्यावर गर्दीत उधळलेला गुलाल होता. फुले होती. अन् त्याचबरोबर जागोजागी विखुरलेल्या चपला आणि बुट दिसत होते. हजारो चपला आणि बुट जागोजागी पडलेल्या होत्या. काही ठिकाणी चपलांचे दोन जोड होते. बुटांचे दोन जोड होते. तर काही ठिकाणी जोडीतील एकच चपल दिसत होती. एकच बुट दिसत होता. लहान मुलांच्या चपलाही यावेळी विखूरलेल्या दिसत होत्या. महिलांच्या चपला या रस्त्यावर सर्वाधिक होत्या. सकाळीच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफसफाई करण्यास घेतली असून या चपला आणि बुट हटवण्याचं काम सुरू आहे.

Exit mobile version