लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मिळालेल्या यशाबद्दल तसेच काँग्रेसने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल काँग्रेस पक्षाने प्रभारी रमेश चेन्नीथला (Ramesh Chennithala) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सेल व विभागाच्या वतीने सत्कार करण्यात आलं. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, “लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,” असे वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सेल व विभागाकडून दादरच्या शिवाजी मंदिर येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाने मोठा विजय मिळवला यात प्रदेश काँग्रेसच्या विविध सेल व विभागाचे कार्य महत्वाचे ठरले आहे. या सर्वांनी राज्यातील गावागावात जाऊन काँग्रेसचा विचार पोहचवण्याचे काम केले. तसेच काँग्रेसच्या ५ न्याय २५ गॅरंटीचे न्यायपत्र घरोघरी पोहचवण्याचे काम केले आहे. लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन त्यांनी केले.
ते पुढे म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे सरकार जनतेत नेहमीच फेक नेरेटिव्ह पसरवत असते. महिलांना आरक्षण देण्याचे विधेयक मोठा गाजावाजा करून मंजूर केले पण त्याची अमंलबजावणी ते करू शकत नाहीत कारण जनगणनाच केलेली आहे. मोफत धान्य देण्याच्या नावाखाली प्लास्टिकचा तांदूळ देऊन गोरगरिब जनतेच्या जीवाशी ते खेळत आहेत. कोरोनाकाळात लस दिली व त्याच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधानांचा फोटो छापण्यात आला. आता त्या लसीमुळेच लोकांचे मृत्यू होत असल्याचे उघड झाले की भाजपा सरकारने जबाबदारी झटकली. भाजपाचे सरकार फक्त दिखाव्याचे काम करते. जबाबदारी काहीच घेत नाही. राज्यात १ लाख लोकांना नोकऱ्या दिल्या असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. हा सुद्धा फेक नेरिटिव्ह पसरवण्याचाच प्रकार आहे असे म्हणत अच्छे दिनचे आश्वासन देऊन भाजपाचे फसवणूक केली पण सत्तेत आलो तर सच्चे दिन नक्कीच आणू,” असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी रमेश चेन्निथला म्हणाले, “काँग्रेस पक्ष हा सर्व समाजांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. आगामी निवडणुकीत सर्व समाज घटकाला प्रतिनिधीत्व मिळावे यासाठी प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडीला चांगला विजय मिळाला आहे, आता विधानसभा निवडणुकीतही जिल्हा, तालुका, बुथ स्तरावर असेच काम करा आणि राज्यातील महायुतीचे भ्रष्ट सरकार हटवून महाविकास आघाडीचे सरकार आणा,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
PM Narendra Modi म्हणाले Congress संविधानविरोधी, INDIA आघाडीचा लोकसभेतून सभात्याग