spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

३० दिवसांऐवजी अवघ्‍या १८ दिवसात बोगदा दुरुस्ती पूर्णत्वास, २३ एप्रिलपासून मुंबईतील पाणीपुरवठा होणार पूर्ववत

मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे.

मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यासाठी भांडुप संकुलापर्यंत पाणी वाहून आणणाऱ्या जलबोगद्याला ठाणे येथे झालेली गळती दुरुस्ती करण्याचे आव्हानात्मक काम बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या पाणीपुरवठा प्रकल्प विभागाने नियोजित ३० दिवसांऐवजी अवघ्या १८ दिवसात पूर्ण केले आहे. हा जलबोगदा पूर्ण क्षमतेने भरुन कार्यान्वित करण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून मुंबई महानगराचा पाणीपुरवठा पूर्ववत होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, या जलबोगद्याची आव्हानात्मक दुरुस्ती अथक प्रयत्न करुन नियोजित वेळेच्या आधी पूर्ण केल्याबद्दल बृहन्‍मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (प्रकल्‍प) श्री. पी. वेलरासू यांनी पाणीपुरवठा प्रकल्प विभागातील अधिकारी – कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. भांडूप संकुल येथील जलशुध्दीकरण केंद्रास ७५ टक्के पाणीपुरवठा हा गुंदवली ते भांडुप संकुल दरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे होतो. सदर जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. ही गळती दुरुस्तीसाठी सदर जलबोगदा दिनांक ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात दिनांक ३१ मार्च २०२३ पासून जलबोगदा पाणी गळती दुरुस्‍तीचे काम पूर्ण होईपर्यंत अंदाजे ३० दिवस कालावधीसाठी १५ टक्‍के कपात जाहीर करण्यात आली होती.

हा जलबोगदा जमिनीपासून सुमारे १०० ते १२५ मीटर खोलवर आहे. हानी पोहचल्याचे ठिकाण भांडुप संकुल झडप (शाफ्ट) पासून सुमारे ४.२ किलोमीटर अंतरावर होते. सुमारे १२५ मीटर खोल व ४.२ किलोमीटर लांब आतमध्ये शिरुन जलबोगद्याची दुरुस्ती करणे, हे जल अभियंता विभाग आणि पाणीपुरवठा प्रकल्प विभागासमोर जणू आव्हानच होते. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांनी दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी प्रत्‍यक्ष भेट देत बोगदा दुरुस्ती ठिकाण, दोन्ही झडपांची पाहणी केली. तसेच, उपायुक्‍त (विशेष अभियांत्रिकी) श्री. चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (पाणीपुरवठा प्रकल्‍प) श्री. वसंत गायकवाड यांना निर्देश दिले. पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सुधाकर हांडे, सहायक अभियंता श्री. शेखर शिंदे, अभियंता (दुय्यम) श्री. राहूल चव्हाण यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी यांनी प्रत्यक्ष दुरुस्ती ठिकाणी अथक प्रयत्न केले आणि दुरुस्ती कामांमध्ये समन्वय देखील साधला. अखेर आज (दिनांक १८ एप्रिल २०२३) या जलबोगदा दुरूस्तीचे काम पूर्ण झाले आहे. अंदाजे ३० दिवसांचा कालावधी दुरुस्तीकरीता अपेक्षित असताना प्रत्यक्ष १८ दिवसांमध्येच ही दुरुस्ती पूर्ण करण्यात आली आहे.

असे पूर्ण झाले काम-

जलबोगदा दुरुस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी जल अभियंता खात्याने, पर्यायी जुन्या जलवाहिन्यांद्वारे भांडुप संकुलापर्यंत पाणी पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि जलबोगदा बंद करुन त्यातील पाणी उपसण्यात आले. जलवाहिन्या व जल बोगद्यावरील झडपांचे नियंत्रण तातडीने केले. एकूण झडपांपैकी सर्वात मोठ्या ३ हजार ७५० मिलीमीटर व्यासाच्या झडपेचे यशस्वीरित्या नियंत्रण केले. प्रत्यक्ष दुरुस्ती काम दिनांक ३१ मार्च २०२३ रोजी सुरु झाले. दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ इत्यादी सर्व गोष्टींची सुसज्जता राखली गेली. यानंतर, भांडुप व कापूरबावडी येथील झडपेचे (शाफ्ट) पोलादी घूमट (डोम) कापून क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्यात आले. क्रेन व पोलादी पाळण्याच्या सहाय्याने संपूर्ण जल बोगद्याचे निरीक्षण करण्यात आले. भगदाड पडून हानी पोहोचलेल्या ठिकाणी आतमध्ये पॅकर टाकून विशिष्ट अशा ग्राऊटिंगने पाणी गळती बंद करण्‍यात आली. आतील दुरुस्ती पॅकर व पोलादी प्लेटच्या सहाय्याने पूर्ण करण्यात आली. त्यानंतर वागळे इस्टेट येथील १०० मीटर खोलीच्या कुपनलिकेमध्ये विशिष्ट प्रकारचे सिमेंट व वाळू यांचे मिश्रण टाकून ते बंद करण्यात आले. बोगद्यातील संपूर्ण उभी केलेली यंत्रणा पुन्हा बाहेर काढण्यात आली. यानंतर कापुरबावडी व भांडूप संकुल येथील पोलादी घुमट (डोम) वेल्डींगच्या सहाय्याने पुन्हा बंद करण्यात आले. हे सर्व काम नियोजन केलेल्या ३० दिवसांच्या तुलनेत १२ दिवस आधीच पूर्ण करण्‍यात आले आहे.

येत्या ३ ते ४ दिवसांत मुंबईतील पाणीपुरवठा पूर्ववत-

दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर आता हा जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यापूर्वी पाण्याने भरून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी जल अभियंता विभागातर्फे उद्या दिनांक १९ एप्रिल २०२३ पासून आवश्यक त्या झडपांच्‍या प्रचलनास तातडीने सुरूवात करण्यात येणार आहे. जल बोगदा पाण्याने भरून घेण्यासाठी अतिरिक्त पाण्याची आवश्यकता आहे. असे असले तरी, या अतिरिक्त पाण्याची पूर्तता करताना सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होणार नाही, याची देखील प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. आवश्यक त्या सर्व बाबी पूर्ण करुन जल बोगदा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या सर्व बाबी विचारात घेता, मुंबई महानगराचा पाणीपुरवठा रविवार, दिनांक २३ एप्रिल २०२३ पासून पूर्ववत होणे अपेक्षित आहे, असे जल अभियंता विभागाने कळविले आहे.

हे ही वाचा : 

मुंबई मेट्रो प्राधिकरणाला सुप्रीम कोर्टाने झापले, १० लाखांचा दंड

Eid-ul-Fitr 2023, भारतात ईद-उल-फित्र कधी साजरी होईल, ईदची नेमकी तारीख आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss