लोकसभा निवडणुकीत मुंबई ईशान्य भागातून उज्ज्वल निकम आणि वर्षा गायकवाड यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. पेशाने वकील असणारे उज्ज्वल निकम आणि आमदार असलेल्या वर्षा गायकवाड यांच्यातील ही लढाई चर्चेची मानली गेली. महाविकास आघाडीतून वर्षा गायकवाड आणि महायुतीकडून उज्ज्वल निकम यांच्या रणधुमाळीत वर्षा गायकवाड यांनी बाजी मारली. या निकालामुळे सर्वजण अवाक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आज १८ जून रोजी खासदार झालेल्या वर्षा गायकवाड यांनी आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. याबद्दलची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप भावनिक आहे. ज्या धारावीतून मी ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले, ते पद मला आज आयुष्याच्या एका नव्या वाटेवर पुढे मार्गक्रमण करण्यासाठी सोडावे लागत आहे. आज संसदेच्या सदस्यत्वाच्या नियमांचे पालन करून मी धारावीच्या आमदार पदाचा राजीनामा देत आहे. पण आज मी जी काही आहे, ती याच धारावीमुळे! माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीला धारावीनेच आपला स्नेहभाव आणि पाठबळ देऊन आज या यशाच्या शिखरावर आणून बसवले आहे, अशा भावना वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केल्या.
धारावी कोणाच्याही स्वार्थापुढे झुकू देणार नाही
धारावी हा माझ्यासाठी केवळ एक मतदारसंघ नसून माझा परिवार आहे. मी आणि माझे संपूर्ण कुटुंब माझ्या धारावी परिवाराशी कायमच जोडलेले राहू, यात काही शंका नाही. गायकवाड कुटुंबाला धारावीने नेहमीच भरभरून प्रेम दिले आहे आणि त्या प्रेमाचे ऋण आमचे कुटुंब यापुढेही फेडत राहील हे मी आवर्जून सांगू इच्छिते. धारावी आपल्या सर्वांची आहे, ती कोणाच्याही स्वार्थापुढे झुकू देणार नाही. धारावीकरांच्या हक्काच्या या लढ्यात मी आणि माझे कुटुंब नेहमीच सहभागी होतो, आहोत आणि राहणार. आपण सर्वजण एकजुटीने लढू आणि नक्कीच जिंकू. मला सदैव भक्कम साथ आणि पाठिंबा दिल्याबद्दल माझ्या धारावी कुटुंबातील सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानते. तुमचे आशीर्वाद माझ्यावर आणि गायकवाड कुटुंबियांवर कायम राहतील, असा विश्वास आहे. कृतज्ञ..! #MyDharavi असे वर्षा गायकवाड यांनी पोस्टमार्फत म्हटले आहे.
हे ही वाचा:
जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु, नाना पटोले
International Justice Day म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास…