१३ ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील येवल्यात धर्मांतराची घोषणा केली होती. या अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकर येवला याठिकाणी उपस्थित होते. यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले की, २०२४ च्या लोकसभेबद्दल एक गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान राहणार नाहीत.
सरकार कोणाचे असेल, हे सध्यातरी सांगता येणार नाही. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्या वेळेला सुद्धा पंतप्रधान व्हायचे असेल तर भाजपला २७२ जागा जिंकाव्या लागतील, पण २०० चा आकडा ते पार करतील असे वाटत नाही. त्यामुळे माझ्या मते येणाऱ्या काळात पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी नसतील, असे प्रकाश आंबेडकर यांनी येवल्यातील जैन पॅलेस या हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
८८ व्या धर्मांतर घोषणा वर्धापन दिनाच्या निमित्ताने येवला, मुक्तिभूमी येथे धम्मा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज त्या ठिकाणी समता सैनिक दलाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले. देशात नवी आघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि याच नव्या युतीचे सरकार येऊ शकते, असे सूचक वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले.
हे ही वाचा:
अजितदादा मुख्यमंत्री होणार ही न घडणारी गोष्ट- शरद पवार
पोरखेळ करताय का? सुप्रीम कोर्टाचा राहुल नार्वेकरांना सवाल ..