पुणेरी पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेले पुणे शहर (Pune) आता बॅनरबाजींमुळे ओळखले जाते. पुणे शहर आणि आजुबाजुच्या परिसरात वेगवेगळ्या आशयाचे बॅनर्स आणि पोस्टर्स नेहमीच चर्चेत असतात. अश्यातच आता महिलांच्या पेहरावावरून लावण्यात आलेले बॅनर आता लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे (Shivpratishthan Hindusthan) संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी महिलांच्या पेहरावावरून केलेल्या वक्तव्यावरून राज्यात खळबळ उडाली होती. यावरून आता पुण्यात बॅनरवॉर रंगले आहे.
काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महिलांच्या पेहरावावरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या वारीत सहभागी होत त्यांनी, “नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनी जावे,” असे वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. मुख्यतः महिलावर्गामध्ये यावरून जोरदार नाराजीही व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर, आता पुण्यात पुणेरी पाटी प्रमाणे अजबच बॅनर लावण्यात आला आहे. या बॅनरद्वारे महिलांना कपड्यांबाबत सल्ला देण्यात आला आहे.
पुण्यातील डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर असणाऱ्या हिरवाई उद्यान येथे हे बॅनर लावण्यात आले आहे. “महिलांनो असे कपडे घाला की कोणी वाईट नजरेनं तुमच्याकडे बघता कामा नये” असा मजकूर या बॅनरमध्ये लिहिलेला आहे. ‘मस्त ग्रुप’ यांनी हा बॅनर लावला असल्याचे बॅनरमध्ये दिसत आहे. याशिवाय त्यावर सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचा फोटो देखील लावण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, त्याच्याच खाली या मस्त ग्रुपला त्यांच्याच शैलीत त्रस्त ग्रुपनं उत्तर देत दुसरं बॅनर लावलं आहे. या बॅनरमध्ये, “पुरुषांनो! मन इतकं निखळ ठेवा कि कुणी कसेही कपडे घातले तरी नजर घसरता काम नये.” सध्या या दोन्ही बॅनरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे नेहमीच चर्चेत
संभाजी भिडे हे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक असून मोठ्या प्रमाणात हिंदूधर्मीय युवक फॉलो करतात. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे संभाजी भिडे नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी, “नट्यांनी आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी वटसावित्रीच्या पूजेला जाऊ नये. साडी नेसलेल्या महिलांनी जावे,” असे वक्तव्य केले होते. तसेच ‘भारताला मिळालेले स्वातंत्र्य दळभद्री आहे,’ असे विधान त्यांनी केले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्यावरसुद्धा वादग्रस्त वक्तव्य केले होते.
हे ही वाचा:
PM Narendra Modi म्हणाले Congress संविधानविरोधी, INDIA आघाडीचा लोकसभेतून सभात्याग