भारत जोडो यात्रादरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनाकडून आंदोलन केले आहे. राज्यभरात विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवण्यात यावी, अशी मागणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. त्यानंतर ठाण्यासह कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, बीड आदी शहरांमधून राहुल गांधी यांच्याविरोधात जोडे मारा आंदोलन करण्यात आलं.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्य वीर सावरकर यांच्या विरोधात अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ राज्यभरात जोडे मार आंदोलन केले जातेय. आज कल्याण पूर्व भागात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाकडून शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जोडे मार आंदोलन करण्यात आले.यावेळी राहूल गांधी यांच्या फोटोची गाढवावरुन मिरवणूक काढण्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
बीडच्या धारूर आणि अंबाजोगाई मध्ये शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन केलं.. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्यभरात भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येत आहे. आणि याच वक्तव्याचा निषेध म्हणून बीडमध्ये देखील ठिक ठिकाणी राहुल गांधी यांच्या फोटोला जेवढे जोडे मरो आंदोलन करण्यात आलं.
तर राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचं पडसाद हिंगोलीमध्ये पाहायला मिळाले. हिंगोली शहरातील गांधी चौकात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले आहे. यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. राहुल गांधी यांच्या प्रतिमेला काळे फासण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे शिंदे गटातील शिवसैनिकांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. मुंबई-गोवा महामार्गावर भरणे नाका येथे शिंदे गटातील शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडून आपला निषेध व्यक्त केला.
भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा आणि शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने उस्मानाबाद शहरातील सावरकर चौकात राहुल गांधी यांच्या विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन केले आहे.
तसेच उल्हासनगरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने त्यांचा निषेध केला. उल्हासनगरमध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून आंदोलन करण्यात आलं. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, उल्हासनगर शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर, अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. उल्हासनगरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आलेल्या या आंदोलनाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी आधी इतिहास वाचावा, आणि मग स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करावी, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी दिली.
नाशिकमध्ये शिंदे गटाचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे (Pravin Tidme) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिंदे गटाचे पदाधिकाऱ्यांसह महिला वर्ग आंदोलनांत सहभागी होता. यावेळी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाय राहुल गांधींच्या पोस्टरला जोडा मारो आंदोलन करण्यात आले. राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
काय म्हणाले होते, राहुल गांधी? –
भारत जोडो यात्रेदरम्यान संबोधित करताना राहुल गांधी यांनी विनायक सावरकर यांच्यावर टीका केली. एकीकडे देशासाठी बलिदान देणारे बिरसा मुंडा आहेत आणि दुसरीकडे स्वत:ला स्वातंत्र्यवीर म्हणवून घेणारे सावरकर आहेत, ज्यांनी देशाच्या विरोधात जाऊन केवळ काँग्रेसला विरोध करण्यासाठी इंग्रज राज्यकर्त्यांना मदत केली” अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रतिक सावरकर हे आहेत. सावरकर दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.
राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार, अटकेची मागणी –
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात मुंबईतल्या शिवाजी पार्क पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोलीत सावरकरांविरोधात केलेली वादग्रस्त वक्तव्यं आणि त्यांच्या अपमानाप्रकरणी राहुल गांधींना अटक करण्याची मागणी रणजीत सावरकर यांनी केली आहे.
हे ही वाचा :
Ranjeet Savarkar : “राहुल गांधींना अटक करा”, रणजीत सावरकरांची मागणी
राहुल गांधीविरोधात मनसेची आक्रमक भुमिका; ‘काळे झेंडे दाखवा’