मागील आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं हातचं सोयाबीन आणि कापूस वाया गेलेलं आहे. आज दुपारनंतर पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे तर मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात देखील मुसळधार पाऊस बरसत आहे.
मुंबईत तर मागील आठवड्याभरापासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे वारंवार मुंबईची तुंबई झाल्याचं पहावयास मिळालं. तसेच मुंबईसह उपनगरात पावसाने त्याची दमदार हजेरी लावली आहे. मुंबईला परतीच्या पावसाने झोडपून काढले आहे. सायंकाळी तासभर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळला. मुखतः मुंबईच्या अंधेरी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, कुर्ला इत्यादी परिसरात जोरदार पाऊस कोसळला. यामुळे मुंबई चे दृश्यमान कमी झाले आहे. तर काही भागात पाणी भरण्यास ही सुरुवात झाली आहे.
दुसरीकडे पुणे शहरातही मुसळधार पाऊस पडला. पुण्यातील कोथरुड, स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगर या भागात पावसाने चांगलेच झोडपले. या पावसामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक ठिकाणी ट्रॅफिक जॅम झालं होतं. पुरंदर, बारामती, दौंड आणि इंदापूर भागात देखील पावसाची संततधार सुरू आहे. पुण्याच्या मावळमध्ये परतीच्या पावसाने तुफान बॅटिंग केलीय, अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांची तारांबळ उडाली, जुना पुणे- मुंबई महामार्गावर पावसामुळे काही अंतरावरील वाहन दिसत नव्हती, आज दुपारी अचानक ढग दाटून आले आणि मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली, पुण्याच्या मावळ, पिंपरी-चिंचवड परिसरात जोरदार पाऊस झाला आहे.
हंगामपश्चात सुरु असलेल्या या पावसामुळे सर्वांचीच तारांबळ उडतेय. हंगाम अटोपला तरीही पाऊस काढता पाय घेत नाहीये. आज शुक्रवारी दुपारी तीननंतर पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पुण्याच्या विविध भागात तब्बल दीड तास चाललेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीला खोळंबा निर्माण झाला होता. पुणे जिल्ह्याला दोन दिवस यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील तीन ते चार पावसाचा जोर असाच कायम राहिल, असं हवामान विभागाने सांगितलं आहे. दरम्यान, मराठवाड्यामध्ये झालेल्या पावसाने शेतात काढून ठेवलेली सोयाबीन वाहून गेली आहे. कापसाच्या वाती झालेल्या आहे. विदर्भातदेखील या पावसाने हातचं पीक गेलंय.
बीड जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसानं थैमान घातलं आहे. या पावसामुळं सोयाबीन आणि कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. रात्रीपासूनच वडवणी तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं काढून ठेवलेलं सोयाबीन पाण्यात गेलं आहे. तर कापसाच्या शेतात देखील पाणी साचल्यानं कापसाच मोठं नुकसान होत आहे. यावर्षी बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस आणि सोयाबीनच क्षेत्र वाढला असून, परतीच्या पावसाचा या पिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच बीड सह सिंधुदुर्ग, पंढरपूर , अहमदनगर, परभणी, लातूर, नांदेड अश्या प्रत्येक जिल्ह्यात पावसाने त्याचा धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे.
हे ही वाचा :
IND vs PAK: भारतीय गोलंदाज बाबर आणि रिझवानला कसे सामोरे जातील, माजी अष्टपैलूने दिला हा खास सल्ला
Andheri East Bypoll 2022 : उमेदवार अर्ज दाखल करण्यापूर्वी ठाकरे गट व भाजपचे जोरदार शक्ती प्रदर्शन