Friday, September 27, 2024

Latest Posts

राज ठाकरें यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी बाप्पाच्या मिरवणूक संपूर्ण दिवसभर पार पडल्या.

राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी बाप्पाच्या मिरवणूक संपूर्ण दिवसभर पार पडल्या. ठिकठिकाणी डीजे, डॉल्बी (Dolbi) लावण्यात आल्या होत्या. या डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काहींचा विसर्जन मिरवणुकींमध्ये मृत्यू झाला. अनेक ठिकाणी डॉब्लीचा दणदणाट पाहायला मिळाला. यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. उत्सव, आनंद साजरा व्हायलाच पाहिजे, पण माफक प्रमाणात असंही राज ठाकरे यांनी म्हटलंय. डीजेच्या आवाजाचा अनेकांना त्रास होतोय, त्याचा परिणामही अनेकांवर होतोय, आपलं कुठेतरी चुकतंय याचा विचार करायला लावणाऱ्या गोष्टी घडत असल्याचे राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंनी एक विचार करायला लावणारा पोस्ट लिहिली आहे. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “डीजे,डॉल्बीच्या आवाजांमुळे अनेकांना त्रास झाला. आपल्या धर्मातील उत्सवांना विरोध करायचा आणि इतर धर्मातील उन्मादावर मौन बाळगायचं अशी एक जमात आपल्याकडे आहे. त्यांचा मुखभंग आम्हीच केला आहे. त्यामुळे धर्माभिमान इत्यादी गोष्टी आम्हाला कोणी शिकवू शकत नाही हे नक्की. पण, गणेश उत्सवात १० दिवस आणि मुख्यतः मिरवणुकांच्या वेळेस डीजे, डॉल्बी यांच्या आवाजच्या कर्कश्श पातळीमुळे हृदय बंद पडणं आणि मृत्यू येणं किंवा बहिरेपण येणं किंवा मिरवणुकीच्या दरम्यान लेझर लाईटमुळे अनेकांची दृष्टी जाणं हे प्रकार वाढले आहेत. सलग २४ तास कानावर आवाज पडून अनेकांची ऐकण्याची शक्ती कमी झाली असेल तर आश्चर्य वाटायला नको.”

राज ठाकरे यांनी पुढे लिहिले आहे “त्यातच एक बातमी आली की एका कुटुंबात एका तरुणाचा मृत्यू झाला होता, आणि त्या घराच्या बाहेर सुरु असलेला डीजेचा आवाज कमी करा सांगितलं म्हणून राग येऊन त्या घरातील लोकांना मारहाण झाली. ही घटना एखादीच असेल, त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याचं कारण नाही. पण कुठेतरी आपलं चुकतंय ह्याचा विचार करायला लावणारी नक्कीच आहे.”तसंच लवकरच सार्वजनिक मंडळांच्या प्रमुखांशी बोलणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. पण एकूण सरकारने आणि राजकीय पक्षांनी मतांच्या राजकारणाच्या पलीकडे जाऊन यावर विचार आणि कृती करायला हवी असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे.

Latest Posts

Don't Miss