Samruddhi Expressway Inauguration : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन मेट्रो शहराला एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्गाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज समृद्धी महामार्गावरील कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो व समृद्धी महामार्गवरील जागेची पाहणी केली होती.
समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना एकमेकांना जोडली जाणार आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई-नागपूर प्रवास सहजरित्या आणि कमी वेळेत होईल. नागपूर (Nagpur)-मुंबई (Mumbai) दरम्यान रहदारी सुलभ व्हावी या उद्देशानं ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किलोमीटरच्या ‘समृद्धी महामार्गाची’ घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते शिर्डी या समृद्धी महामार्गाच्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. त्यासोबतच नागपूर मेट्रोच्या रिच टू व रिच थ्री याचे देखील लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. आज देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पाहणी केली. या पाहणी दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांकडून पंतप्रधान मोदी यांचा दौरा व कार्यक्रमाची माहिती समजून घेतली. उद्घाटन कार्यक्रमाला २० हजारांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जागेची पाहणी करण्यात आली. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग एकमेव हरित क्षेत्र प्रकल्प आहे. नागपूर ते मुंबई प्रवासी वाहतूक आठ तासात आणि मालवाहतूक १६ तासात शक्य होईल. कमाल गती घाटात प्रतितास शंभर किलोमीटर आणि सपाट रस्त्यावर १५० किलोमीटर आहे. तसेच हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागाच्या समृद्धीसाठी महत्वाचा ठरणार आहे. राज्याच्या ५ महसूल विभागांच्या १० जिल्ह्यातील २६ तालुक्यांमधील ३९२ गावांमधून जाणारा हा ६ पदरी महामार्ग आहे.
हे ही वाचा :
शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा