शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज (शनिवार, २७ जुलै) ६५ वा वाढदिवस असून मातोश्री बाहेर शिवसैनिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी जागोजागी मोठमोठे बॅनर्स लावून त्यांना शुभेच्छादेखील दिल्या आहेत. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावला आहे. यावर आता शिवसेना उबाठा पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. आज (शनिवार, २७ जुलै) संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्त्व केले, जिवीताचे संरक्षण केले ते लोकं विसरलेले नाहीत,’ असे वक्तव्य केले.
यावेळी ते म्हणाले, “सांगलीत ज्यांनी भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असे पोस्टर लावले आहेत. ते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील येथे उपस्थित आहे. या लोकभावना आहेत, त्या भावना लोकं अशा पद्धतीने व्यक्त करत असतात, त्याविषयी कोणाला दुख: वाटण्याचे कारण नाही. काही पक्षामध्ये तर तीन-तीन नेत्यांचे बॅनर्स लागतात भावी मुख्यमंत्री म्हणून काही ठिकाणी चार-चार नेत्यांचे बॅनर्स लागतात आणि महायुतीमध्ये सात लोकं मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आहेत. उद्धव ठाकरे यांनी संकटकाळात या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जे नेतृत्त्व केले, जिवीताचे संरक्षण केले ते लोकं विसरलेले नाहीत, एक आश्वासक चेहरा आहे आणि दुसरे म्हणजे संघर्षातून ते पुन्हा उभे राहिले आहेत नेहमीच राहतात,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “गुजरातच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा या व्यापाऱ्यांनी सत्ता, पैशाच्या बळावर हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ओरबडून घेतली. आमचे चिन्ह, आमचा पक्ष हा ओरबडून घेतला आणि गद्दारांच्या हातात सोपवला त्या संकटकाळात सुद्धा उद्धव ठाकरे जिद्दीने उभे राहिले त्यांनी आपला पक्ष नव्याने उभा केला, नऊ खासदार नव्या चिन्हावर निवडून आणले आणि आज आम्ही विधानसभा जिंकण्याच्या दिशेने दमदार पावले टाकत आहोत. या राज्यातील जनता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभी राहिली. लोकं बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करत होते तेवढच प्रेम ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात. गुजरातमधून औरंगजेबाचे कितीही चेले-चपाटे आले तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम येणार नाही, ठाकरे यांचे यांचे नेतृत्व संपवता येणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांचा फॅन्स क्लबच चालतो, औरंगजेब फॅन्स क्लब भाजपा आणि गुजरातमध्ये चालतो कारण औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला आणि आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आम्ही शिवसेना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने निर्माण केली,” असे ते यावेळी म्हणाले.
शरद पवारांनी सांगितली सुप्रिया सुळेंच्या लग्नाचा खास किस्सा, जावई नेमका कसा शोधला?