मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी (Sitaram Yechury) यांचं आज दि. १२ सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सीताराम येचुरी यांना १९ ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते ७२ वर्षांचे होते. श्वसन मार्गात जंतुसंसर्ग झाल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज त्यांचं उपचारांदरम्यान निधन झालं.
सीताराम येचुरी यांच्या निधनांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत म्हणाले की, “ज्येष्ठ माकप नेते कॉ. सीताराम येचुरी यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणूस यांच्या हितासाठी आपले आयुष्य झोकून देणारा एक विचारवंत, तत्वनिष्ठ नेता देशाने गमावला आहे. त्यांची पक्षनिष्ठा आणि पक्षाच्या विचाराशी असलेली प्रामाणिक बांधिलकी हा राजकारणाच्या क्षेत्रात सदैव आदर्श ठरणार आहे. राजकीय भूमिकांबाबत मतभिन्नता असूनही कोणत्याही राजकीय नेत्यांसोबत मनभेद असू नयेत”, अशी निखळ मानवतावादी वृत्ती जपणारे येचुरी यांच्या स्मृतीस शिंदे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
तसेच शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सीताराम येचुरी यांच्या निधनांनंतर सोशल मीडियावर ट्विट केले आहे की, “सीताराम येचुरी यांचे हे जाण्याचे वय नव्हते. राजकारणातील पाच दशके त्यांनी संघर्ष केला. विद्यार्थी चळवळीपासून सुरु झालेली त्यांची यात्रा कम्युनिस्ट पक्षाच्या महासचिवपदावर येऊन संपली. उत्तम वक्ता, अर्थविषयाचा अभ्यासक, तत्वांशी तडजोड न करणारा नेता, डाव्या चळवळतील संयमी आणि प्रसन्न चेहरा असे येचुरी होते. इंडिया आघाडीच्या बैठकीत ते भेटत व मोकळेपणाने बोलत. सगळ्याच राजकीय पक्षात ते प्रिय होते. त्यांचे अचानक जाणे धक्कादायक आहे”. त्यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली आहे.
सीताराम येचुरी यांच्या निधनानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. “सीताराम येचुरी माझे मित्र होते. ते देशाच्या विचारांचे रक्षक होते. आम्ही भरपूर वेळ चर्चा करायचो. या दुःखद प्रसंगी सीताराम येचुरी यांच्या कुटुंबासोबत आणि त्यांच्या मित्र आणि समर्थकांसोबत माझ्य संवेदना आहेत.” असे राहुल गांधी म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही सीताराम येचुरी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणतात की,”माकपाचे सरचिटणीस आणि ज्येष्ठ पॉलिट ब्युरो सदस्य कॉ. सीताराम येचुरी यांचे निधन झाल्याची बातमी अतिशय दुःखद आहे. ‘आयडिया ऑफ इंडिया’ आणखी बुलंद होत असताना त्यांची एक्झिट वेदनादायी आहे. कॉ. येचुरी यांनी सदैव शोषित, वंचित आणि कष्टकरी जनतेच्या हिताचा विचार मांडला. त्यांच्या निधनामुळे साम्यवादी विचारांची मशाल कायम पेटती ठेवणारे नेतृत्व हरपले”.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी देखील सीताराम येचुरी यांच्या निधनाच्या वृत्तावर दुःख व्यक्त केले आहे.
हे ही वाचा:
‘या’ बॉलिवूड अभिनेत्रींनी सामाजिक नेतृत्व करणारे उपक्रम सुरू केले…जाणून घ्या सविस्तर
Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लागला तर BJP आणि मोदी सरकार जबाबदार असेल: Balasaheb Thorat